गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आज आपल्या लाडक्या आराध्य दैवताला अर्थात गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर मुंबईसह राज्यभरातील लाडका बाप्पाचे दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर विसर्जन केले जाणार आहे. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाले यानंतर गेली दहा दिवस बाप्पाची मनोभावे पुजा आरती करण्यात आली. यानंतर आज गणपती चालले गावाला., चैन पडेना आम्हाला या नामगजरात बाप्पाचं विसर्जन केले जाणार आहे. दरम्यान गणेशभक्त भावनिक होत बाप्पाच्या विसर्जनाची मिरणुकीत सहभागी होत आहेत. विशेषत; मुंबईतील अनेक मोठ्या गणेश मंडळांच्या गणपती मूर्तींचे आज विसर्जन होणार आहे. यात लालबाग, परळ, चिंचपोकळी, गिरगाव परिसरात अनेक मोठी गणेशोत्सव मंडळ आहेत. गणपती विसर्जन सोहळ्यानिमित्त या भागात आज मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर आज ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. दोन वर्षानंतर कोरोनाचं विघ्न दूर होत असल्याने यंदा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक आहे. लाखोंच्या संख्येने गणेशभक्त आज बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी करत आहे.
#WATCH | Maharashtra: People bid goodbye to Lord Ganesh for this year at the end of 10-day-long Ganeshotsav; visuals from Mumbai
#GaneshVisarjan pic.twitter.com/LEWyrUxKU9
— ANI (@ANI) September 9, 2022
दरम्यान मुंबईत आज सकाळपासूनच लालबाग, परळ भागात गणेशभक्तांनी बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी केली आहे. यात मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्लीतील मुंबईचा राजा, गिरगावचा राजा, खेतवाडी, चिंतामणी अशा सर्व गणपतींची आज भव्य विसर्जन मिरवणूक निघाण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा गणपती मंडळाचा मान पहिला असतो. त्यानुसार आज सकाळीच सर्वप्रथम मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीसह बाहेर पडला आहे. त्यानंतर तेजुकाया गणपती, चिंतपोकळीचा चिंतामणी आणि इतर गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले आहेत. मुंबईतील अनेक मोठे गणपती आता ढोल ताशांचा गजरासह, मुक्त गुलालाच्या रंगात नाहून गिरगाव चौपटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. यात लालबागचा राजा देखील विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे. यामुळे गणेश भक्तांमधील विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
मुंबईसह राज्यातील गणेश विसर्जनात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झाले आहेत. एकट्या मुंबईत जवळपास 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी याची देही याची डोळा भाविकांना लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा अनुभवण्यास मिळणार आहे. त्यामुळे चौपाट्या, रस्ते, तलाव परिसर आणि मंडळांबाहेर होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे.
मुंबईत आज विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना अनेक रस्त्यांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र यात भाजीपाला, दूध, बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स, रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे.