शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. तर भाजपकडूनही युतीसाठी इशारे करण्यात येत आहेत. भाजप नेते गिरीश बापट यांनीही शिवसनेला खुली ऑफर दिली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप- शिवसेनेची युती होऊ शकते असा इशारा गिरीश बापट यांनी दिला आहे. शिवसेनेनं निर्णय घ्यावा असे वक्तव्यही बापट यांनी केलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपची आणि शिवसेनेची युती होऊ शकते असेही बापट यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते गिरीश बापट यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला आहे. पुणे महापालिका निवडणूकीसाठी आम्ही सज्ज असून शिवसेना आणि भाजपच्या युतीचे संकेत दिले आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचेही बापट यांनी म्हटलं आहे. भाजप आणि शिवसेनेती युती ही हिंदुत्वावर होती. यामुळे ती पुढेही होऊ शकते. सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सगळ्यांच्या मनातलं बोलले आहेत. भाजपची शिवसेनेसोबत भविष्यात युती होऊ शकते असा विश्वासही गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय जीवनात अशा गोष्टी घडतात भाजपची आणि शिवसेनेची युती नैसर्गिक होती परंतु कृत्रिम लोकांनी ती तोडली. जर भविष्यात पुन्हा युती झाली तर भाजप कार्यकरत्यांनाही आनंदच होईल असे वक्तव्य गिरीश बापट यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीला पक्ष मानत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष असल्याचे मी मानत नाही. हा पक्ष नसून पश्चिम महाराष्ट्रातील पार्टी असल्याचे गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. तर पुण्यातील गर्दीप्रकरणी बापट यांनी म्हटलं की, अजित पवार राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचे ऐकत नाहीत हे माहीत होत परंतु अजित पवारांचे कार्यकर्ते ऐकत नाही हे माहित नव्हते असा टोलाही बापट यांनी लगावला आहे. पुण्यातील बैठकीत अजित पवार म्हणाले होते गर्दी केली तर १५ दिवस क्वारंटाईन करणार आणि नंतर म्हणतात कार्यकर्ते ऐकत नाहीत असे गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.