मुंबई – गेल्या कित्येक वर्षांपासून घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांना (Mill Workers) म्हाडाने (Mhada) आता दिलासा दिला आहे. म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी २५२१ घरांसाठी सोडत निघाली आहे. ठाणे-रायगडमधील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहपकल्पातील घरांसाठी ही सोडत असणार आहे. १९ डिसेंबर ते १७ जानेवारीपर्यंत गिरणी कामगार घरांसाठी अर्ज करू शकतात.
१९७८-८० कालावधीत झालेल्या गिरणी कामगार संपामुळे मुंबईतील ५८ गिरण्या बंद पडल्या. तेव्हा गिरणी कामगार देशोधडीला लागला. रोजगार बंद पडल्याने गिरणी कामगारांचा उदरनिर्वाह होणं कठीण होऊन बसलं. पर्यायी नोकरी किंवा व्यवसाय करूनही अनेक गिरणी कामगारांना मुलभूत गरजाही पूर्ण करता आल्या नाहीत. अशा कामगारांना दिलासा द्यावा याकरता म्हाडाकडून घरे देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार, काही गिरणी कामगारांना घरे देण्यात आली आहेत. तर, काही गिरणी कामगार किंवा त्यांचे कुटुंबीय अद्यापही घराच्या प्रतिक्षेत आहेत. आता म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी सोडत निघाली आहे.
हेही वाचा – म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, ठाणे-नवी मुंबईसाठी निघणार लॉटरी
म्हाडाकडून देण्यात येणारी घरे ही ठाणे आणि रायगड येथील आहेत. म्हाडाकडे आता टाटा हाऊसिंग कंपनीने ठाणे जिल्ह्यातील रांजनोळीमध्ये 1244, विनय अगरवाल शिलोटर यांनी रायगड जिल्ह्यात रायचुरमध्ये बांधलेली 1019 तर सॅनव्हो व्हिलेज लि. ने कोल्हेमध्ये बांधलेली 258 घरं उपलब्ध झाली आहेत. यातील 6 सदनिका वगळता सर्व सदनिका 320 चौ. फुटांच्या आहेत.
गिरणी कामगारांकडून पावणे दोन लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये अनेकांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केल्याने संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रारुप यादीतील १२ हजार ९८१ अर्जदारांची यादी वेबसाईटवर टाकण्यात आली आहे. यामध्ये एकापेक्षा एक अधिक अर्ज केलेल्यांनी म्हाडाकडे अर्ज करायचा आहे. कोणता एक अर्ज ग्राह्य धरायचा याबातचा विनंती अर्ज कामगारांना करावा लागले. यासाठी १९ डिसेंबर ते १७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यता आली आहे.
हेही वाचा – म्हाडा ऑनलाईन भरती परीक्षा घोटाळ्याप्रकरणी ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल