पहिवहन मंत्री अनिल परब आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केला आहे. पहिवहन मंत्री अनिल परबांनी आपले अपयश झाकण्याकरिताच आमच्यावर आरोप केले आहेत.पण ज्या पद्धतीने मुंबईतील गिरणी कामगारांचा संप चिघळला, त्यानुसारच एसटी कामगारांच्या संपाची दशा परिवहन मंत्र्यांकडून करण्याचा डाव आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव दिसतोय, असाही आरोप पडळकर यांनी केला आहे.
मुघलशाही पद्धतीने मेस्मा
मी आणि सदाभाऊ, एस.टी कर्मचाऱ्यांचे डोके भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देतायेत.त्याचा आम्ही विरोध व निषेध करतो. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे. त्याच चालाखीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काही मार्ग निघाला असता, असाही टोला पडळकर यांनी लगावला.
करोडोच्या जमीनींची विल्हेवाट लावण्याचा परिवहन मंत्र्यांचा डाव
ज्या पद्धतीने मुंबई मील कामगारांचा संप चिघळवला व शेवटी अनिर्णयीत परिस्थितीत आणून ठेवला आणि नंतर मील मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोची टक्केवारी गोळा केली होती. त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव दिसतोय.