हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला आजपासून सुरूवात झाली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. वीजतोडणी तात्काळ सुरू करावी यासाठी लक्षवेधी आणली होती, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले. त्यानंतर वीजतोडणी संदर्भातील मुद्दा हा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित करत शेतकऱ्यांकडे वीज बिलं भरण्याचा तगादा राज्य सरकारकडून लावला जात आहे, असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहे. या विषयावर चर्चा सुरू होती. परंतु यावरती मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ते हाच विषय केंद्र सरकारसमोर मांडणार होते. शेतकऱ्यांना देण्यात आलेली बिलं चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांचं ३ एचपीचं कनेक्शन आहे त्यांना ५ एचपीची बिलं दिली जात आहेत.
शेतकऱ्यांकडे वीज बिलं भरण्याचा तगादा
एकनाथ ठाकरे हे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आहेत. त्यांनी वीस वर्षांपूर्वी वीज कनेक्शनबाबत MSEB कडे अर्ज केला. परंतु त्यांना कनेक्शन मिळालं नाही. ६ डिसेंबर २०२१ रोजी ७३ हजार ९० रूपयांचं बिलं भरण्याचा तगादा महावितरणाच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. त्याचप्रकारे इतर शेतकऱ्यांचे बिलं देखील वाढवून दिले जात आहेत.
वीज जोडणीबाबत राज्य सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांविरोधात
वीज जोडणीबाबत राज्य सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांविरोधात आहे. एकीकडे हे शेतकऱ्यांसाठी चांगलं बोलतात. पण दुसरीकडे शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात आहेत. त्यामुळे त्यांची वीड तोडणी करण्यात येऊ नये,अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात आल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.
शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जाऊ नये
शेतकऱ्याला जे अनुदान दिलं जातं. ते कंपनीला दुप्पट दिलं जात आहे. अशा प्रकारचा मोठा घोटाळा महावितरण कंपन्यांकडून केला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने याविषयी विशेष लक्ष द्यायला पाहीजे. तसेच ही बिलं दुरूस्ती करून घ्यावीत आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जाऊ नये, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.