महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसांच्या उपचारानंतर राज्यपालांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यपाल रुग्णालयात असताना त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडीविरोधात पत्र लिहिले होते. या पत्रावर आणि महाविकास आघाडीबाबत राज्यपाल महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर आता राज्यपाल यांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत असलेल्या सरकारमधून शिवसेनेने बाहेर पडावे अशी मागणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये राज्यपालांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपच्या मागणीवर अद्याप राज्यपालांकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. परंतु कायदेशीर बाबी तपासून राज्यपाल निर्णय घेतील असे सांगण्यात येत आहे.
आज चार दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सर्व शुभचिंतकांचे याद्वारे मनःपूर्वक आभार मानतो. pic.twitter.com/mPFsws4pmF
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 26, 2022
महाविकास आघाडीबाबत माहिती घेण्याची शक्यता
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता घरी परतल्याने महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या सत्ता नाट्याची माहिती घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट फोन करुन राज्यपाल चर्चा करु शकतात. मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडी यावर राज्यपाल अधिक माहिती घेऊन काही निर्णय घेऊ शकतात किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाकडून राज्यपालांना पत्र जाणार?
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपण शिवसेनेतच असल्याचे म्हटलं आहे. तसेच या आमदारांनी अद्याप महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढला नाही. यामधील १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र देण्यात आले आहे. परंतु शिंदे गटाकडून राज्यपालांना पत्र जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : तुम्ही मुंबईत या, मी स्वतः एअरपोर्टवर स्वागताला येईन; बंडखोर आमदारांना संजय राऊतांचं आवाहन