राज्यभरात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात पार पडला. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईभर अनेक दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली, तसेच गोविंदांना प्रोत्साहन दिले, विशेष म्हणजे दहीहंडीच्या आदल्या दिवशी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळले अशी घोषणा केली. या निर्णयांचे अनेकांनी स्वागत केले मात्र अनेकांकडून तीव्र विरोध केला जात आहे. यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचाही समावेश आहे. राज्य सरकारने काही शहरातील महापालिका निवडणुकी डोळ्यासमोर ठेवत हा निर्णय घेतल्याचा आरोप एमपीएससीच्या विद्यार्थींनी करत निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. आधीच अनेक पदे रिक्त असताना त्यावर चर्चा करायची सोडून सरकारची जुमलेबाजी करत असल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केलाय. याचबाबत आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ न देता, गोविंदांना 5 टक्क्यांच्या क्रिडा आरक्षणात भविष्यात साहसी खेळ म्हणून दहीहंडीचा समावेश केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी दहीहंडी सणाला साहसी क्रिडा प्रकारात समाविष्ठ करण्यासंदर्भात टीका करण्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
उदय सामंत म्हणाले की, दहीहंडी खेळाच्या प्रकारामुळे कुठल्याही एमपीएसीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही हे खात्रीने सांगतो. 5 टक्के क्रिडा विभागाचे जे आरक्षण आहे त्यात सुरुवातीच्या क्रिडा प्रकारांवरही अन्याय होणार नाही. पण या 5 टक्क्यांच्या आरक्षणात भविष्यात साहसी खेळ म्हणून दहीहंडीचा समावेश केला जाणार आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. यासाठी एक नियमावली तयार केली जाणार आहे. नियमावली तयार करताना वयोगट, शिक्षण काय असावे याचे निकष ठरवले जाणार आहेत. तालुका, जिल्हा स्तरावर स्पर्धा असल्या पाहिजेत त्यातून टॅलेंट सर्च केले जाईल. या सर्वाचा परिपाक म्हणजे एखाद्या खेळाचा उपक्रम करत असताना पूर्वीचे जे साहसी खेळ आहेत त्यात कॉमा टाकून हा खेळ अॅड होणार आहे. यातून असे नाही की, पूर्वीच्या खेळांची मान्यता रद्द होणार आहे. त्यांना 5 टक्के आरक्षण मिळणार नाही असं होणार नाही.असही उदय सामंत म्हणाले.
एखाद्या खेळाच्या प्रकारामध्ये अशिक्षित आहेत म्हणून हिणवणे कितपत योग्य? सामंतांचा सवाल
उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला, काल काही लोकांनी असे म्हटले की, गोविंदांचे थर लावणारे अशिक्षित असतात, त्यामुळे अशिक्षित लोकांना कशाप्रकारे क्रायटेरिया लावून तुम्ही नोकरी देणार? अशा प्रश्न उपस्थित केला गेला. इथे बसलेल्यांमध्येही ग्रॅज्युएट लोक आहेत तज्ज्ञ लोक आहेत. एखाद्या खेळाच्या प्रकारामध्ये अशिक्षित आहेत म्हणून हिणवणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत याचा विचार महाराष्ट्रातील जनता भविष्यात नक्की करेल. असही ते म्हणाले.
जय जवान पथकाने काल नऊ थर लावून रेकॉर्ड केला. या गोविंदांप्रमाणे स्पेनमध्येही अशाप्रकारे मनोरा उभं करण्याची स्पर्धा होती. त्यातूनही चांगल्याप्रकारची मुलं तयार होतात. हा साहसी खेळ कशासाठी जाहीर केला तर ही मुलं सहा सहा महिने व्यायाम शाळेत जाऊन सराव करतात. त्यानंतर हे मनोरे रचतात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आरक्षण जाहीर केलं तर ते 24 तासात लागू होईल, अशा पद्धतीच्या भावना काही लोक जाणीवपूर्वक समाजात निर्माण करत आहेत. हा सरकारचा अपमान नाही तर हा महाराष्ट्रातील गोविंदांचा अपमान आहे. तुम्ही त्यांना अशिक्षित म्हणता. असही सामंत म्हणाले.
कुठल्याही सरकारला वाटलं नाही दहीहंडीला पारंपारिक सणाला दर्जा द्यावा
२०१३ मध्ये राज्याचा क्रिडा मंत्री असताना त्यावेळीपासून दहीहंडी साहसी खेळ व्हावा अशी मागणी केली जात होती. गेल्या २० वर्षांपासून ही मागणी होत आहे. त्यानंतर इतकी सरकार आली पण कुठल्याही सरकारला वाटलं नाही की या पारंपारिक सणाला दर्जा द्यावा. त्यातील मुलांना चांगल्या पद्धतीची नोकरी द्यावी, असं कोणाला वाटलं नाही. अशी खंतही सामंत यांनी व्यक्त केली.
काही लोकांना काल विचारलं की, तुम्ही हजारो गोविंदांना आरक्षण देणार का? यावरून खरचं काही लोकांची कीव करावीशी वाटते. यातून टॅलेंट सर्च होईल. क्रिडी विभागाकडून नियमावली बनवली जाईल. त्यामुळे गैरसमज पसरवण्यापेक्षा हिंदू धर्मातील चांगला सण जागतिक पातळीवर ऑलिंपिकमध्ये जावा यासाठी या स्पर्धा ३६५ दिवस चालल्या पाहिजेत यासाठीही सर्वांना नियोजन केले आहे. गैरसमज पसरवण्यापेक्षा विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा द्यावा. अशी मागणीही सामंतांनी केली आहे.