करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कठोर अंमलबजावणी सुरु करत सरकारी आणि खाजगी कंपन्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, असं असतानाही नाशिक रोडला शेकडो कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी एकत्र बोलावून घेतल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून डेटा एन्ट्रीचे काम करुन घेत असल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अशी करण्यात आली कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा फैलाव होऊ नये, याकरता गर्दी करु नये, अशी खबरदारी घेण्याचे आदेश असताना देखील गायकवाड मळ्यातील चिरायु रुग्णालयाच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर ‘बीआरव्ही डाटा एन्ट्री सर्व्हिसेस एन्टरप्रायझेस’ या कंपनीत शेकडो महिला कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून डेटा एन्ट्रीचे काम करुन घेत असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे सोमवारी, दुपारी ११.३० वाजता उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सनिली रोहकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनवीर परदेशी, सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश गवळी, स्वप्नील सपकाळे, सुनिल बाविस्कर,आदींनी बीआरव्ही कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला.
दरम्यान, याप्रकरणी मालक रजिंद्र अन्न्त (६०) आणि व्यवस्थापक रोहित विसपुते (२२) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीत दोन शिफ्टमध्ये कामकाज चालू असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे करोना विषाणूची लागण होऊ नये, म्हणून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. मास्क, सॅनेटायझर त्याचप्रमाणे दोन कर्मचाऱ्यांमधील अंतर केवळ एक फुटाचे होते. या ठिकाणी कामावर येणाऱ्या कामगारांचे थर्मल स्कॅनिंग होत नव्हते, अशा अत्यंत धोकादायक पद्धतीने कामगारांना एकत्र ठेवून त्यांच्याकडून काम करुन घेतल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीत एकूण ८० कर्मचारी काम करत होते. त्यात ७६ तरुणी, महिला तर मॅनेजर आणि तीन सुपरवायझर काम करताना आढळले. – मनवीर परदेशी; सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनगर पोलीस ठाणे
हेही वाचा – मुंबईतील 23 शाळांकडे पालकांचा कानाडोळा