वर्धा : अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये साडेपाचशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर झेंडा फडकला आहे. माझ्या मते जनतेने अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला अशाप्रकारे सलामी दिली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाला जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मत व्यक्त केले. ‘घड्याळ तेच वेळ नवी, निर्धार नवपर्वाचा’ या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवशी सुनील तटकरे यांनी वर्धा येथे पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया मांडली. (Gram Panchayat Elections People salute the decision taken by Ajit Pawar Sunil Tatkares reaction)
हेही वाचा – …तर ओबीसी आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
सुनील तटकरे म्हणाले की, पक्ष संघटनेची बांधणी करावी आणि अजितदादांनी घेतलेल्या निर्णयाची कारणमीमांसा सांगणे, देशात व राज्यात एकविचाराचे सरकार असावे हे सांगण्यासाठी ‘घड्याळ तेच वेळ नवी,’ निर्धार नवपर्वाचा’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. अस्थिरता निर्माण होते तेव्हा भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात. मात्र आम्ही काहीतरी वेगळे केले आहे, हे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून हे अभियान सुरू केले असल्याचे सुनील तटकरे म्हणाले.
यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपासोबत गेलो असा जाणीवपूर्वक आभास निर्माण केला गेला, तो निखालस खोटा आहे. 2014 मध्ये भाजपाने पाठिंबा मागितला नव्हता, परंतु तरीही आम्ही पाठिंबा जाहीर केला होता. परंतु ज्या कॉंग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला नेहमी विरोध केला, त्याच ठाकरेंच्या शिवसेनेला कॉंग्रेसने सत्तेत पाठिंबा दिला, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.
हेही वाचा – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! शिंदे सरकार महागाई भत्त्यात करणार ‘इतकी’ वाढ
गुवाहाटीला एकनाथ शिंदे गेल्यावर सत्तेत अस्थिरता निर्माण झाल्याने आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहून भाजपासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्या पत्रावर सर्वांच्या सह्या होत्या. मात्र तो निर्णय झाला नाही. असे असले तरी राज्यात नवीन कार्यकर्त्यांची फळी अजित पवारांच्या आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली तयार होताना दिसत आहे, असेही सुनील तटकरे म्हणाले.
ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा नारा देणार्या महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सेवाग्राम आश्रमाला आज भेट दिली. यावेळी त्या काळात महात्मा गांधीजी कसे रहात होते आणि स्वातंत्र काळात चळवळी इथून कशा घडल्या याची माहिती घेतल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. वर्ध्यातील पत्रकार परिषदेला महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री सुबोध मोहिते, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आदी उपस्थित होते.