मुंबई – हनुमान चालीसा पठण प्रकरणी दोषमुक्त करण्यासाठी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी राणा दाम्पत्य जामीनावर आहे.
हेही वाचा – ही घटना हिंदू संस्कृतीला डाग; नवनीत राणांनी थेट लोकसभेत मांडला जुळ्या बहिणींच्या लग्नाचा मुद्दा
गेल्यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याविरोधात आवाज उठवला होता. यावेळी राज ठाकरेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला होता. राज ठाकरेंच्या याच आवाहानाला पाठिंबा देत राणा दाम्प्त्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले. मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी न झाल्यास मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचू असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार, राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा निश्चय केला.
यावेळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. राणा दाम्प्त्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्य अटकेतही होते. मात्र, त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. सध्या ते या प्रकरणी जामीनावर आहे. त्यामुळे या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी विशेष न्यायालयात केली आआहे. न्यायालयाने त्यांच्या अर्जावर २ फेब्रुवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
याप्रकरणावर सुनावणी सुरू असातना राणा दाम्पत्य सतत गैरहजर राहत होते. त्यामुळे न्यायालायने त्यांना वॉरंट बजावले होते. वॉरंट मिळताच राणा दाम्पत्यााने सुनावणीला हजेरी लावली. त्यामुळे त्यांचा वॉरंट रद्द करण्यात आला. या सुनावणीवेळी त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले.
हेही वाचा – मुख्यमंत्री होणारी महिला घरातील की बाहेरची?, नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल