मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने उद्योगपती हर्ष गोयंका यांनी भारत आणि पाकिस्तानची तुलना करत ‘का ते मला सांगा?’ असा सवाल केला आहे.
केंद्रातील भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’चा पुरस्कार करत विविध क्षेत्रातील पराविलंबत्व कमी केले आहे. विशेषत: संरक्षण क्षेत्रातील प्रगती उल्लेखनीय आहे. याशिवाय, कोरोना महामारीच्या काळातही भारताने त्याचा ठामपणे सामना केला आणि कोरोनाप्रतिबंधक लसही भारतीयांबरोबरच इतर देशांसाठीही उपलब्ध केली. स्टार्टअप, मेक इन इंडिया अशा उपक्रमाबरोबरच संरक्षण दलातील ‘अग्निपथ’ भरती योजना लागू करत, तरुणाईला संधी उपलब्ध करून दिली आहे.
75 years back 2 countries got independence:
One is growing to be one of the world’s largest economies, the other is in the brink of disaster.
One leads in technology, IT, science, the other in terrorism.
One a vibrant democracy, the other a political basket case.
Tell me why?— Harsh Goenka (@hvgoenka) August 14, 2022
आंतरराष्ट्रीय धोरण देखील भारताचे इतर देशांशी संबंध दृढ करणारेच आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. अमेरिकेशी धोरणात्मक संबंध असतानाही रशियाकडून तेल घेणे भारताने सुरूच ठेवल्याबद्दल लाहोरमधील मोठ्या सभेत त्यांनी भारताचे कौतुक केले आहे. यासंदर्भात त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा व्हिडीओ देखील त्या सभेत दाखवला. आपल्या जनतेसाठी जे काही सर्वोत्तम करता येईल, ते भारत करणारच, जयशंकर यांनी म्हटले आहे. यावर इम्रान खान यांनी ‘याला म्हणतात स्वतंत्र देश’ अशा शब्दांत कौतुक केले आहे.
या पार्श्वभूमीवर आरपीजी समूहाचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी भारत आणि पाकिस्तानमधील फरक दर्शविणारे ट्वीट केले आहे. ’75 वर्षांपूर्वी दोन देशांना स्वातंत्र्य मिळाले. एक जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनत आहे, तर दुसरी आर्थिक गर्तेच्या उंबरठ्यावर आहे. एक तंत्रज्ञान, आयटी, विज्ञानात तर दुसरा दहशतवादात आघाडीवर आहे. एका देशात चैतन्यपूर्ण लोकशाही आहे तर दुसरीकडे विकावू खिचडीचे राजकारण आहे. का ते मला सांगा?’ असे त्यांनी ट्वीट त्यांनी केले आहे. हर्ष गोयंका हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे हे ट्वीट व्हायरल झाले आहे.