ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी नाशिक येथून पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर कडाडले. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांनी गद्दारीबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, “आम्हाला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे होते, असं शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता त्यांनी गद्दारी का केली हे उघड झालं आहे. हेच आम्ही कोर्टात सांगणार आहोत.” त्यामुळे आता ठाकरे गटाला आणखी एक मुद्दा सुप्रीम कोर्टात उपस्थित करण्यासाठी मिळाला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिंदेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात आश्वासन दिलं की व्हिप काढणार नाही, ते आता कोर्टाचाही सन्मान राखायला तयार नाहीत. तसेच, मनीष सिसोदियांना झालेली अटक हा लोकशाहीवर झालेला मोठा हल्ला आहे. दिल्लीचे ते उपमुख्यमंत्री आहेत. शिक्षण मंत्री आहेत. त्यांनी तयार केलेल्या सरकारी शाळा या जगात नावाजल्या जात आहेत. अबकारी धोरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. तो मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. हे सरकार सरकारी यंत्रणांचा गैरफायदा घेत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांबाबतबोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात आता पैशांचेच राजकारण सुरु आहे. सर्वकाही पैशानचे विकत घेता येते. असा अहंकार सध्या राज्यकर्त्यांना आला आहे. पुण्याची जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. शिंदेंना वाटते त्या प्रमाणे जगातील ३३ देशांनी त्यांच्या गद्दारीची दखल घेतली आहे.”
हेही वाचा – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळणार, खासदार राहुल शेवाळेंचा विश्वास
काश्मीरमध्ये भाजपचे नेते पाय ठेवू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. काश्मिरी पंडितांची टार्गेट किलिंग होत आहे. तिथे आता जाऊन पाहायलाही भाजपचे नेते तयार नाहीत. काश्मिरी पंडित घरवापसीची वाट पाहात आहेत. त्यांना भेटायला हे तयार नाहीत. असा आरोप राऊतांनी भाजप नेत्यांवर केला.