केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासोबत आज काही राज्यातील आरोग्यमंत्री यांच्यासोबत व्हिसीद्वारे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राची स्तुती करण्यात आली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. टोपे म्हणाले की, ‘जरी राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख कमी होताना दिसत असला तरी काही जिल्ह्यात तो वाढतो आहे. त्यामुळे आपल्याला सतत काळजी करावी लागणार आहे.’
नक्की काय म्हणाले राजेश टोपे?
‘राज्यात सध्या ५ लाख ४६ हजार हा सक्रिय रुग्णांचा मोठा आकडा असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. कारण आता राज्यातील रुग्णसंख्येचा आलेख कमी होतोना दिसत आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख उतरता आहे, पण काही जिल्ह्यात तो वाढतोय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, मराठवाड्यात बीड या जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढत आहे. त्यामुळे काळजी आपल्याला सतत करावीच लागणार आणि घ्यावीच लागणार आहे. तसेच सतत जागरूक राहावे लागणार आहे,’ असे राजेश टोपे म्हणाले.
पुढे राजेश टोपे म्हणाले की, ‘केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासोबतची व्हिसीद्वारे बैठक १ वाजता सुरू झाली होती ती सुमारे ३.३० ते ४ वाजतेपर्यंत होती. या व्हिसीमध्ये हर्ष वर्धन यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे आणि ही चांगली बाब आहे. तसेच टेस्टिंगमध्ये महाराष्ट्र उत्तर पद्धतीने काम करत आहे, असे डॉ. हर्ष वर्धन यांचे शब्द आहेत.’