ठाणे | ‘दोन दिवसांत अहवाल आल्यानर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रात्री 17 रुग्णांच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात 17 जणांचा मृत्यू होण्यामागचे कारण का? पत्रकारांच्या प्रश्नावर तानाजी सावंत म्हणाले, “पहिले 5 मृत्यू झाल्यानंतर मी सर्व माहिती घेतली होती. रात्री 17 रुग्णांचे मृत्यू झालेत, त्यासंदर्भात सर्व माहिती मी माहिती घेतली आहे. पहिले 5 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल 1 ते 2 दिवसात येईल. यानंतर रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील 13 आयसीयू आणि 4 जनरल वॉर्डमध्ये झाले. तसेच 17 रुग्णांचा मृत्यू नेमके शामुळे झालेत याचा अहवाल मागविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोषींवर योग्यती कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू
लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे…
मुख्यमंत्र्यांच्या शहरातील ही घटना आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर तानाजी सावंत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या शहरात, गडचिरोली किंवा चंद्रपूरात हे सर्व महाराष्ट्राचे नागरीक आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे महाराष्ट्र शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. एखादी घटना कोणत्या भागात घडली ही वेळी गोष्ट आहे. दुर्गम भागात जरी एखादी घटना घडली तरी ती शासनाची जबाबदारी आहे. राज्य सरकार जबाबदारीपासून पळ काढत नाही. हे कशामुळे झाले, दोन दिवसात अहवाल येईल, ज्यामुळे ही घटना घडली त्यावर योग्यती कारवाई केली जाईल.”
हेही वाचा – ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
रुग्णालयावर प्रचंड ताण
या रुग्णालयातील डॉक्टरांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून या रुग्णांच्या मृत्यूचे कारण देखील पाहणे गरजेचे आहे. सिव्हिल रुग्णालय पुनर्बांधणीसाठी बंद असल्यामुळे सर्व ताण हा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येत आहे, अशी माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली आहे. म्हस्के पुढे म्हणाले, “यामुळे मेंटल हॉस्पिटलच्या परिसरात उपलब्ध असलेल्या जागेत सिव्हिल रुग्णालय सुरू करण्यात आलेले आहे आणि त्या रुग्णालयात रुग्णांना भर्ती देखील केले जाते. पण रुग्णालयाबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. त्यामुळे रुग्ण हे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णलायत येतात. या रुग्णालयात महाड, पोलांदपूर, चिपळूणपासून रुग्ण येथे येतात. यामुळे रुग्णालयावर प्रचंड ताण येतो.”