राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने खेडमधील जगबुडी नदी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली आहे. जगबुडी नदी काठच्या सुमारे ३० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन तालुक्यातील दोन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेडमधील जगबुडी आणि राजापूरमधील कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अलसुरे निळीक, भोस्ते, शिव बुद्रुक आदी. गावांचा समावेश आहे.
खेड पालिका हद्दीत नदीकाठी झोपडपट्टी आहे. तेथील ३७ कुटुंबांना गेल्या आठवड्यात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मुकदाम हायस्कूल, एलपी स्कुल आदी ठिकाणी या कुटुंबाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मुंबईलाही मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला. दादर, सायन, माटुंगा, परळ, किंग्ज सर्कल, गांधी मार्केट परिसरात पाणी साचले होते. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. तसेच, या मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही बसला होता. पालघर, नाशिक आणि पुणे या तीन जिल्ह्यांना गुरुवारी रेड अलर्ट देण्यात आला असून, येथे अतिवृष्टीची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : भंडाऱ्यात भर पावसात बस आणि ट्रकचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू