राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या भागांत जोरदार पाऊस पडत आहे. काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचा जोर अधिक वाढल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाने काल सायंकाळपासूनचं दमदार हजेरी लावली आहे. तर ठाणे, कल्याण डोंबिवलीत, पालघरा भागातलही पावसाचा जोर अधिक वाढला आहे.
यात हवामान विभागाने पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा, कोल्हापूरला पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले आहे. ज्यामुळे वाहतूक मंद गतीनं सुरु आहे. दरम्यान रेल्वे मार्गावरही पावसाचा परिणाम दिसून येत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक दहा मिनिटे तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 7 मिनिटे उशारीने सुरु आहे.
मुंबईतील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, वांद्रे भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान कल्याण भागात सुरु असलेल्या पावसामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे.
दरम्यान मुसळधार पावसामुळे पुण्यातील चारही धरणं ओव्हर फ्लो झाली आहेत. तर नाशिकच्या गोदावरी नदीला पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे.