मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. अशातच हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच, अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय, मुंबईतही पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Heavy rainfall alert in maharashtra and mumbai)
राज्यात काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यासह मुंबईलाही 8, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 48 तासांत अधिक तीव्र होणार असल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
राज्याच्या अनेक भागांतील नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीव विस्कळीत झाले आहे. तसेच, कोकण परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्यस्थितीत राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस नोंदवला जात आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टीसदृश पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भात पुढील तीन दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, 10 ऑगस्ट बुधवार रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून मान्सूनने मुंबईसह राज्यभरात दडी मारली होती. मात्र, सध्या जोरदार बॅटींग होत आहे. तसेच, मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे