काल (बुधवारी) मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह इतर शेती पिकांचे नुकसान झाले. यावर्षी सोयाबीन लागवडीपासूनच सतत होणारा पाऊस, गोगलगाय, रोगराई अशी संकटे येत असल्यामुळे पावसाचा फटका बसला आहे.
जोरदार वारे आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात 1 महिला आणि 2 जनावरांचा मृत्यू झाला. हिंगोलीतील फुल शेती पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे. इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. परभणीत 3 दिवसापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले आहे. येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात 2 दिवसापासून सतत पावसामुळे अनेक शेत शिवारात पाणी जमा झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेले आहे. पावसाने आता उसंत घेतली नाहीतर तर नुकसान न भरुन येण्यासारखी स्थिती तयार होईल.
हिंगोलीत फूलशेतीचे नुकसान –
हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस आणि आताच शेतकऱ्याच्या हातात येणाऱ्या झेंडूच्या फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झेंडूच्या फुलांमध्ये पाणी साचले असून संपूर्ण झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगामी दसरा सणाला ही सर्व झेंडूची फुलं शेतकऱ्याला मोबदला मिळवून देणार होती.
तर दुसरीकडे जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला होता. वाई बोल्डा रोडवरील ओढ्याला पूर आल्याने अनेक मजूर अडकून पडले होते. अखेर या मजुरांना जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने या बाहेर काढण्यात आले. तसेच प्रवास करणाऱ्या अनेक गाड्या या पुरामुळे थांबलेल्या होत्या.
परभणीत सलग तीन दिवस पाऊस –
परभणीत सलग 3 ऱ्या दिवशी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेली सोयाबीनचे पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडल्याने येलदरी आणि लोअर दुधना धरणातूनही पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे.