घर महाराष्ट्र मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद; मनसेच्या यात्रेपूर्वीच सरकारचा निर्णय

मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद; मनसेच्या यात्रेपूर्वीच सरकारचा निर्णय

Subscribe

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) अवजड वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी ही घोषणा केली असून मुंबई-गोवा महामार्ग हा आज (27 ऑगस्ट) ते 28 स्परेंबरपर्यंत अवजड वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे अर्धवट कामाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली. या मुद्यावर मनसेने आज जागर यात्रा काढली आहे.

या महामार्गावरील अवजड वाहतुकी ही आज सायंकाळी सहा वाजल्यापासून पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. महामार्गावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याचे लक्षात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून महामार्गावरील अवजड वाहतुकीसाठी हा महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचे निर्देश रायगड जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला दिल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

- Advertisement -

यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांनी व्हिडीओ ट्वीट करत मुंबई-गोवा महामार्ग हा अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये रवींद्र चव्हाण म्हणाले, “आज एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव तीन आठवड्यावर येऊन ठेपला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या विविध टप्प्यावर अहोरात्र काम सुरु असताना अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रचंड ताण विशेषतः रायगड जिल्ह्यातील रस्ते कामावर येतोय म्हणून उद्या २७ ऑगस्ट २०२३ पासून २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत या महामार्गावर अवजड वाहतूकीवर बंदी आणण्याचे सरकारने ठरवले आहे. प्राधान्यक्रम मुंबई गोवा महामार्गाला दिला आहे. कारण माझा कोकणी चाकरमानी लवकरच गणेशोत्सवासाठी गावी प्रवासाला निघायचा आहे. पळस्पे ते वाकण फाटा या दरम्यान अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी जायचे असल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. २०२२ पासूनची आज पाहणीची ९ वी वेळ होती. भाजपाचा कार्यकर्ता आहे. कर्तव्याला चुकणार नाही…. आणि कर्म करायला त्याहूनही नाही….”

- Advertisement -

हेही वाचा – “महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा…”; ‘या’ मंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसेची जागर यात्रा

गेल्या बारा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. या महामार्गाचे अर्धवट काम आणि खड्डे यावर राज ठाकरे यांनी पनवेलच्या सभेतून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली होती. यानंतर राज ठाकरेंनी महामार्गाची पाहणी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर आज मनसेची जागर यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. ही यात्रा मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातून पदयात्रेला सुरुवात झाली असून कोलाडमध्ये यात्रेचा समालोर पोहणार आहे. यानंतर राज ठाकरे यांचे संगमस्थळी भाषण होणार आहे.

- Advertisment -