संपूर्ण जून महिना कोरडा गेला. मात्र जुलै महिन्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुंबईसह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. तर, पावसाने कोकणातही थैमान माजवले आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (High alert in kokan region, railway track flooded)
कोकणाला ऑरेंज अलर्ट
कोकणाला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे होणारी संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी रत्नागिरी आणि रायगडमध्ये एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. चिपळून शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, खेड आणि लांजा येथे प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
रेल्वे रुळ पाण्याखाली
वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला आहे. तर, वेंगुर्लामधील मानसीश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राजापुराला पुराने वेढलं
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरला पुराने वेढलं आहे. अनेक नद्या भरल्याने वाहू लागल्या आहेत. पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर राजापूरशेजारी असलेल्या लांजा तालुक्यात लोकवस्तीत पाणी शिरलं आहे. अंजणारी बस स्टॉपजवळील लोकवस्तीत पाणी शिरलं आहे. तीव्र उतरावरील रस्त्याला गटार नसल्याने पाणी वस्तीत शिरल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, लांजा आपत्कालीन कक्षाला सूचना मिळताच सार्वजनिक बांधकाम अधिकारी तलाठी घटनास्थळी पोचले आहेत. खेडमधील जगबुडी, संगमेश्वर-लांजा तालुक्यातील काजळी नदी आणि चिपळूणमधील वशिष्ठ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सावित्री नदीची पाणी पातळी वाढली
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, रायगडमधील सावित्री नदीची पाणी पातळी वाढली आहे. काल, सोमवार दुपारपासून महाडसह पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर रायगडात देखील अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
चिपळण शहर जलमय
गेल्यावर्षी चिपळूनला पुराने वेढलं होतं. यंदाही पावसाने थैमान माजवल्याने त्याचा फटका चिपळूण तालुक्याला बसला आहे. संपूर्ण शहर जलमय झालं असून मुंबई-गोवा महामार्गाला नदीचं रुप प्राप्त झालं आहे.