जिंतूर औंढा मार्गावरील लिंबाळा गावाजवळ असताना भरधाव वेगातील जीपसमोर रानडुकरांचा कळप आला. अचानक समोर आलेल्या रानडुकरांमुळं चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जीप रस्त्यावरून खाली उतरून उलटली. लग्न सोहळ्यासाठी औरंगाबादहून उमरखेडकडे जाणाऱ्या जीपला आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे.
गणेश खरूसकर असे ठार झालेल्या बालकाचे नाव आहे. तर, अन्य चार जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त जीपचा क्रमांक एम एच २० डीजे ८८ ४९ असा असून त्यात एकूण दहा प्रवासी होते. यात गणेश अवधूत खरूसकर हा पाच वर्षीय बालक ठार झाला असून तनुजा जाधव, जयश्री जाधव, राजू काळे, प्रवीण रुपनर (रा. औरंगाबाद) हे चार जण जखमी झाले. लिंबाळा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.