धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात काही दिवसांपूर्वी लाजिरवाणी घटना घडली होती. सोशल मीडियावरील अफवांना बळी पडून पाच निष्पाप लोकांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे याच घटनेची पुनर्रावृत्ती होता होता टळली. १ जुलै रोजी पाटोदा बस स्टँड जवळ एक अज्ञात व्यक्ती आला असताना त्याच्याभोवती गावातील नागरिक जमा झाले आणि त्याला मारहाण करु लागले. या घटनेची माहिती मिळतातच पाटोदा गावचे उपसरपंच गफार पठाण तिथे पोहोचले. गावकऱ्यांना बाजुला सारत त्यांनी मारहाण करु नका, असे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती जामखेड पोलीस स्थानकात दिली. पोलिसांनीही तात्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत त्या अनोळखी व्यक्तीस ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला गेला.
ताब्यात घेतलेल्या इसमाकडे अधिक चौकशी केल्यानंतर कळले की, तो जामखेड तालुक्यातीलच रहिवासी होता. चौकशी नंतर त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पाटोद्याचे उपसरपंच गफार पठाण वेळीच यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे एका निरपराध नागरिकाचे प्राण वाचले, याचे पोलिसांनी कौतुक केले आहे.
अफवांवर गावकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या गावात आढळून आल्यास त्याला मारहाण न करता पोलिसांशी संपर्क साधावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी केले आहे.
जून व जुलै या दोन महिन्यात महाराष्ट्रात ठिकठिकाणी मारहाणीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याआधी अशा घटनांचे प्रमाण हे तुरळक होते. वैजापूर तालुक्यात ८ जून रोजी चोर समजून आठ लोकांना बेदम मारहाण करण्यात आली होती. यामध्ये दोघांचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी झाले होते. तर २ जुलै रोजी धुळेच्या घटनेचे पडसात मालेगाव येथे पडताना दिसले होते. मालेगावात एक पुरुष आणि एक महिला जमावाच्या भक्ष्यस्थानी सापडले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांच्या गाड्यांनाही लक्ष्य केले होते.
राज्याचे नवे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी पदभार सांभाळताच एक पत्रक काढून सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे आवाहन केले होते. तसेच एक पत्रक काढून पोलिसांनी अशा घटनांना गांभीर्याने घेण्यास सांगितले आहे.