राज्यात पुढील ४ दिवस सण आणि कार्यक्रम असल्यामुळे शासकीय सुट्ट्या आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात लोकं बाहेर पडतील. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था विभागाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली असून पोलिसांनी आपण सुरक्षेसाठी सज्ज असल्याचे सांगिलं अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कायदा आणि सुव्यवस्था विभागाची बैठक पार पडल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे गृहमंत्री म्हणाले की, राज्यात होणाऱ्या काही सणांच्या निमित्ताने ज्याच्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, रमजान असे सगळे सण किंवा कार्यक्रम एकत्र आले आहेत. साधारणपणे सगळे नागरिक अतिशय उत्साहात सर्व साजरे करत असतात. त्या दृष्टिकोणातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी महाराष्ट्रात आणि मुंबईत पोलिसांच्या माध्यमातून जी तयारी करायला पाहिजे ज्या संदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी पूर्ण तयारीत रहावे तसेच पोलिसांनीसुद्धा आश्वासन दिले आहे की, आम्ही तयारीत आहे. यामुळे राज्यातील सगळे सण शांततेत पार पडतील अशी आमची तयारी आहे. अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
राज्याची स्थिती बिघडेल असं वक्तव्य करु नका
राज्यात कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. तसेच राज्याची स्थिती बिघडेल अशी वक्तव्य करु नका असेही राजकीय नेत्यांना आवाहन केलं आहे. राज्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत आहेत. यावर राज्याच्या पोलिसांची करडी नजर असून तात्काळ पोलीस कारवाई करतील असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले आहेत. राजकीय नेत्यांनीसुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्ये करु नयेत तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांना बळी पडू नये, यामुळे सगळ्यांना विनंती आहे की, सगळ्यांनी या दिवसांत सहकार्य करावे आणि शांततेने हे सण साजरे करण्यासाठी मदत करावी असे गृहमंत्री म्हणाले आहेत.