काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला आहे. तसेच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. नाना पटोले यांनी आपला राजकीय शत्रू आणि प्रतिस्पर्धी कोण आहे? हे पाहून समजदारपणे भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपांबाबत प्रश्न करण्यात आला होता. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सोबत काम करत आहेत. जर एखाद्या प्रश्नावरुन जर कुठे काही मतभेद झाला तर त्याचा अर्थ लगेच महाविकास आघाडीमध्ये काही गडबड आहे. असा अर्थ काढण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील परंतु हीच अपेक्षा आहे की, आपल्याला लढायचे आहे ते भाजपच्या विरोधात लढायचे आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसन एकत्र राहून लढायचे आहे. त्याप्रमाणे काम करायचे आहे असे वळसे पाटील म्हणाले आहेत.
गोंदियामध्ये आणि भंडारामध्ये जे काही घडलं स्थानिक प्रश्न आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेतले गेले. त्याचे राज्य स्तरावर प्रश्न करण्याची गरज नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जबाबदारीने आणि समजदारीने भूमिका घेतली पाहिजे. आपला शत्रू कोण आहे ते त्यांनी पाहिले पाहिजे असा सल्ला गृहमंत्र्यांनी नाना पटोलेंना दिला आहे.
विकृत परिस्थितीचे समर्थन करु नये
केतकी चितळेच्या पोस्टचे आमदार सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलं आहेत. यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. परंतु कोणी अशा विकृत प्रवृत्तीचे समर्थन कोणी करु नये. त्या महिलेवर १७ ते १८ प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून त्यांची मानसिकता दिसत आहे. हे काही योग्य नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका बदलली असावी.
हेही वाचा : महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार? राष्ट्रवादीवरील आरोपानंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य