सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत. मराठा आरक्षणावरुन वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रांमध्ये याविषयी बऱ्याच चर्चांना उधान आलेले दिसत आहे. आरक्षणासाठी आता सरकार आणि विरोधीपक्ष यांच्यातील वादविवाद शिगेला पोहोचला आहे. आता याच घडामोडींच्या धर्तीवर राज्याचे गृहविभाग खाते देखील जागृत झालेले दिसत आहे. राज्यातील गृहविभागामध्ये मोठा खांदेपालट झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राज्याचे गृहविभाग सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात व्यस्त होते. यावेळी गृहविभागाने तब्बल ९५ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
कुठल्या अधिकाऱ्यांची कुठे बदली?
यामध्ये गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात धडक मोहीम राबवणारे अभिनव देशमुख यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली आहे. तर, दंगल हाताळण्यात यशस्वी ठरलेले औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी वरिष्ठ अधिकारी पी. पी. मुत्याल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गृहविभागाने केलेल्या या बदल्यात सातारा येथील पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांची पुणे ग्रामीणला बदली केली आहे. तर संदिप पाटील यांच्या जागी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूरचे अधीक्षक संजय मोहिते यांना पदोन्नती देत त्यांची नाशिक पोलीस अकादमीच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
याअगोदर कधी झाली होती बदली?
या अगोदर मे महिन्यात देखील राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये औरंगाबाद कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या यशस्वी जाधव यांना साईड पोस्टिंग देण्यात आली होती. जाधव यांची मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी आणि व्हीआयपी सुरक्षापदी बदली करण्यात आली होती.