घरमहाराष्ट्रबाजारातले घोडे जास्त बोली लागल्यानं विकले गेले, संजय राऊतांचा अपक्ष आमदारांवर हल्लाबोल

बाजारातले घोडे जास्त बोली लागल्यानं विकले गेले, संजय राऊतांचा अपक्ष आमदारांवर हल्लाबोल

Subscribe

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हासुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केलीय, त्यांची यादी आमच्याकडे आहे. त्यांनी नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहितीय कोणी मतं दिली नाहीत. पण ठीक आहे आपण पाहूयात, असंही संजय राऊतांनी सांगितलंय

मुंबईः काही जे बाजारातले नेहमीचे घोडे असतात, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते. जास्त बोली लागली, असं मला वाटतंय. इतर काही कारणं असतील. त्यामुळेच आमची साधारण सहा एक मतं होती, अपक्षांची ती आम्हाला मिळाली नाहीत. ते कोणाचेच नसतात, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अपक्ष आमदारांवर जोरदार हल्ला चढवलाय. संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

आमचे जे घटकपक्ष आहेत, छोटे पक्ष आहेत जे शिवसेनेबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर आहेत, त्यांचं एकही मत फुटलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असेल, बच्चू कडूंचा पक्ष असेल, शंकरराव गडाख असतील, येड्राव्हकर असतील किंवा इतर काही मते असतील जी आम्ही चर्चा केली होती. जे पक्षाबरोबर आणि आघाडीबरोबर आहेत ती मतं सगळीच्या सगळी आम्हाला मिळालेली आहेत. फक्त घोडेबाजारात जे लोक उभे होते, त्यांची सहा ते सात मतं मिळू शकलेली नाहीत. आम्ही कोणत्याही व्यवहारात पडलेलो नाही. आम्ही व्यापार केला नाही. तरी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हासुद्धा आमचा एक विजय आहे. ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केलीय, त्यांची यादी आमच्याकडे आहे. त्यांनी नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहितीय कोणी मतं दिली नाहीत. पण ठीक आहे आपण पाहूयात, असंही संजय राऊतांनी सांगितलंय.

- Advertisement -

सुहास कांदेचं मत का बाद केलं आणि कोणत्या कारणासाठी बाद केलं हा एक निवडणूक प्रक्रियेतला संशोधनाचा विषय आहे. सुहास कांदे यांचं मत ज्या कारणासाठी बाद झालं, त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवारांच्या मताला आक्षेप घेतला आहे. प्रत्यक्ष मतदान करत असताना कोणत्याही प्रकारचं धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं, अमरावतीचे शहाणे जे काही उद्योग करत होते, त्यांचं मत घटनेनुसार बाद व्हायला हवं. पण फक्त आमचं मत बाद करून पहाटे ज्या काही गोष्टी करण्यात आल्या, यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे, त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही असेच उपक्रम करत राहा आणि महाराष्ट्राचा एकदाचा कायमचा घोडेबाजार करून टाका. मी फक्त 42 कोटाच्या मतांवर लढलेलो आहे. मी विजयी झालो त्याबद्दल उद्धव ठाकरे आणि माझ्या पक्षाचा ऋणी आहे. घोडे तिकडे असतील घोडे इकडे असतील हरभरे टाकले की ते कुठेही जातात. अपक्ष आमदारांनी हरभरे खाल्ले, असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय.

आमचा उमेदवार पराभूत झाला म्हणणार नाही, तो विजयी होऊ शकला नाही. राज्यसभेची निवडणुकीची प्रक्रिया फारच किचकट आहे. आमचं शिवसेनेचं एक मत बाद केलं. अशाच प्रकारच्या काही मतांवरचा आक्षेप आम्ही समोर घेतला होता. त्याच प्रकारची चूक समोरच्यांनी केली होती. पण त्यांची मतं बाद नाही झाली. निवडणूक आयोगानं त्यांची मतं बाद नाही केली. पण सात तास घेतले. मत शोधण्यासाठी नक्की कोणाला पडणारं मत बाद झालं. शेवटी या देशातल्या केंद्रीय यंत्रणा या राजकीय पक्षांच्या सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली कशा प्रकारे काम करतात हे काल आम्ही डोळ्यांनी पाहत होतो. कुठे ईडी वापरलं जातं. कुठे सीबीआय वापरलं जातं. कुठे अशा प्रकारच्या निवडणूक यंत्रणाही वापरल्या जातात का? अशी शंका येतेय. नक्कीच आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. याचा अर्थ असा नाही कोणीतरी समोर फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला. आपली एक जागा भारतीय जनता पक्षानं जिंकलीय. पहिल्या फेरीची, पहिल्या क्रमांकाची 33 मतं आम्हाला मिळालेली आहेत. 27 मतं ही भाजपचे उमेदवार धनंजय महाडिकांना मिळालेली आहेत. तसं म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतं, तिसऱ्या पसंतीची मतं त्या गणितावरून जय विजय ठरत असतात, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचाः बोरू बहाद्दर कारकून, “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले; संदीप देशपांडेंनी शिवसेनेची उडवली खिल्ली

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -