मुंबई – नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अॅण्ड ट्रान्सफॉर्मेशन संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय अशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हल्लोबल केला आहे. बिल्डरच्या हाती महाराष्ट्राच्या नियोजनाची जबाबदारी देणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा – ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ. राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती
महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रिमियम कमी करण्यात आल्याने काही बांधकाम व्यावसायिकांना फायदा होणार होता. यामध्ये अजय अशर यांचाही समावेश आहे, असा आरोप तत्कालीन विरोधी पक्षाने केला होता. आत याच बांधकाम व्यावसायिकाला महाराष्ट्राच्या नियोजनाची जबाबदारी दिली आहे. यावरून सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.
मविआ सरकारच्या काळात प्रिमियम कमी केल्याने काही बिल्डरांना प्रचंड नफा होणार आहे असा आरोप ज्या बिल्डरांवर केला सत्ता परिवर्तनानंतर त्यांनाच “मित्र” बनवून त्यांना महाराष्ट्राच्या नियोजनाची जबाबदारी देणं याला काय म्हणावे? याउपरही बिल्डरच्या हाती नियोजन देणे कितपत योग्य आहे?, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे.
मविआ सरकारच्या काळात प्रिमियम कमी केल्याने काही बिल्डरांना प्रचंड नफा होणार आहे असा आरोप ज्या बिल्डरांवर केला सत्ता परिवर्तनानंतर त्यांनाच “मित्र” बनवून त्यांना महाराष्ट्राच्या नियोजनाची जबाबदारी देणं याला काय म्हणावे? या उपरही बिल्डरच्या हाती नियोजन देणे कितपत योग्य आहे? pic.twitter.com/TkyDf5S3iU
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 2, 2022
नीती आयोगाच्या (Niti Committee) धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय आशर यांना बांधकाम क्षेत्र, सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. तर, राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत. नीती आयोगाच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी पदरचना यापूर्वीच करण्यात आलेली आहे.