मुंबई : जळगावच्या पाचोरा येथे स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी या पत्रकाराला दूरध्वनीवरून शिवीगाळ करून धमकीही दिली होती. यावरून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे गृहमंत्री अशाप्रकारचे हल्ले स्वस्थपणे बसून कसे काय पाहू शकतात? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
महाराष्ट्रात आजकाल मुख्यमंत्र्यांना अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून पत्रकाराला अमानुषपणे भररस्त्यात गुंड पाठवून मारहाण केली जाते,हि अतिशय गंभीर आणि लोकशाहीविरोधी बाब आहे.प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे त्याचे हनन अशाप्रकारे केले जात असेल तर ते दुर्दैवी आहे.राज्याचे… pic.twitter.com/4RDc4Nypms
— Supriya Sule (@supriya_sule) August 10, 2023
एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरण जळगाव जिल्ह्यात अलीकडेच घडले होते. यावरून संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने आमदार किशोर पाटील संतप्त झाले होते. त्यांनी पत्रकार महाजन यांना फोनवरून शिवीगाळ करून मारहाणीची धमकीही दिली होती. याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडीओ क्लिप माझीच असल्याचे सांगत पाटील यांनी, पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे. मी माझे शब्द मागे घेणार नाही, असे म्हटले होते. त्यापाठोपाठ आता या पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली.
हेही वाचा – सत्तेची नशा अशी असते का? पत्रकार मारहाण प्रकरणावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात आजकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून गुंड पाठवून पत्रकाराला भररस्त्यात अमानुषपणे मारहाण केली जाते, ही अतिशय गंभीर आणि लोकशाहीविरोधी बाब आहे. प्रश्न विचारणे हा पत्रकारांचा अधिकार आहे त्याचे हनन अशाप्रकारे केले जात असेल तर ते दुर्दैवी आहे, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – पत्रकाराला मारहाण; पाचोऱ्याच्या आमदाराला बहिणीनेच सुनावले खडेबोल
राज्याचे गृहमंत्री अशाप्रकारचे हल्ले स्वस्थपणे बसून कसे काय पाहू शकतात? त्यांनी पत्रकारावर हल्ला करणारे गुंड आणि त्यांचे बोलविते धनी यांच्यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.