मुंबईः संजय राऊत शिवसेनेच्या पराभवाचं खापर अपक्षांवर कसं फोडू शकतात, असं म्हणत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर पलटवार केलाय. पहिल्या क्रमांकाची 33 मतं शिवसेनेच्या संजय पवारांना दिलेली आहेत तर धनंजय महाडिकांना 23 मतं मिळाली आहेत. म्हणजे दहा मतांचा फरक आहे. मग ही 10 मतं कुणाची आहेत…?, असा सवालही देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केलाय.
दुसऱ्या पसंतीची मतं संजय पवारांना जेवढी मिळायला हवी होती, तेवढी मिळाली नाहीत, हे खरं आहे. मी महाविकास आघाडीसोबत पहिल्या दिवसापासून आहे. सरकार स्थापन होण्याआधीपासून मी अजित पवारांसोबत आहे, शिवसेना नंतर सरकार स्थापन होण्यासाठी आल्याचा टोलाही देवेंद्र भुयार यांनी लगावलाय.
संजय राऊतांचा नेमका आरोप काय?
फक्त घोडेबाजारात जे लोक उभे होते, त्यांची सहा ते सात मतं मिळू शकलेली नाहीत. सोलापूरचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे, नांदेडचे अपक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, अमरावतीच्या मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील या सहा आमदारांनी ऐनवेळी मत बदलल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलं.
नक्कीच आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. याचा अर्थ असा नाही कोणीतरी समोर फार मोठा देदीप्यमान विजय मिळवला. आपली एक जागा भारतीय जनता पक्षानं जिंकलीय. पहिल्या फेरीची, पहिल्या क्रमांकाची 33 मतं आम्हाला मिळालेली आहेत. 27 मतं ही भाजपचे उमेदवार धनंजय महाडिकांना मिळालेली आहेत. तसं म्हटलं तर 33 आणि 27 मध्ये फरक आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतं, तिसऱ्या पसंतीची मतं त्या गणितावरून जय विजय ठरत असतात, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचाः बोरू बहाद्दर कारकून, “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले; संदीप देशपांडेंनी शिवसेनेची उडवली खिल्ली