परीक्षेच्या तासभरापूर्वीच मिळाली होती बारावी गणिताची प्रश्नपत्रिका, पेपरफुटीप्रकरणी नवी अपडेट

बारावीच्या पेपरफुटीचं कनेक्शन आता अहमदनगरपर्यंत पोहचलं असून आता आणखी एक माहिती समोर आली आहे.

HSC Paper Leak Case

बारावीच्या पेपरफुटीचं कनेक्शन आता अहमदनगरपर्यंत पोहचलं असून आता आणखी एक माहिती समोर आली आहे. अहमदनगरमधील तब्बल ११९ विद्यार्थ्यांना परिक्षेच्या तासाभरापूर्वीच गणिताची प्रश्नपत्रिका मिळाली असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रान्चच्या तपासातून ही मोठी बाब समोर आली आहे. गणिताचा पेपर सोपवण्यात आलेल्या एचएससी बोर्डाच्या सदस्यांची भूमिकाही हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने सुरू केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झालीय. ३ मार्चला बारावी गणिताचा पेपर महाविद्यालयातील विद्यार्थांना एक तास आधीच मिळाला होता. मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील एकूण ३३७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील जवळपास ११९ विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे याच महाविद्यालयात आले होते. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी १० हजार रुपये घेतल्याचे समोर आलं आहे.

ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रान्चच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या महाविद्यालयात 337 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 119 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे महाविद्यालयातच आले होते. दहा हजार रुपयांना पेपर फुटल्याचं या आधी तपासात समोर आलं होतं.

महाविद्यालयाच्या संस्थाचालकसंदर्भातही काही पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस महाविद्यालयाच्या संस्थाचालकाचा शोध घेत आहेत. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा या उद्देशाने शाळेच्या व्यवस्थापनाने पेपर फोडला. याचा तपास सध्या सुरु आहे.

पेपरफुटी प्रकरणात शिक्षण मंडळातील लोकांचाही समावेश आहे का, याचा शोध घेतला जात आहे. कारण कोणत्याही विषयाची प्रश्नपत्रिका बोर्डाच्या नियमानुसार महाविद्यालयाशी संबंधित शिक्षकाकडे दिली जात नाही. मात्र, अहमदनगरच्या महाविद्यालयात तसं करण्यात आलं. प्रश्नपत्रिका ज्या रनरकडे सोपवायच्या असतात तो दुसऱ्या महाविद्यालयातील असणे गरजेचे आहे. परंतु, हे सर्व नियम धाब्यावर बसून मातोश्री भागूबाई भामरे महाविद्यालयातील शिक्षकांच्या हातात गणिताची प्रश्नपत्रिका सोपवण्यात आली. शिक्षण मंडळातील व्यक्तींच्या पाठिंब्याशिवाय ही गोष्ट घडू शकत नाही. त्यामुळेच गुन्हे शाखेचा संशय शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांवर आहे.

सध्या बारावीचे काही पेपर बाकी असल्याने परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यांना हा पेपर कोणाच्या माध्यमातून आणि कसा मिळाला, याची शहानिशा केली जाणार आहे.