राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. याबाबतचं पत्र त्यांनी राज्य सरकारला लिहिलं आहे. यामुळे आता राज्य सरकारला चौकशीसाठी दुसरा अधिकारी नेमावा लागणार आहे. संजय पांडे यांनी घाबरुन माघार घेतली नसून, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी तसंच अनेक ज्येष्ठ विधीज्ञ यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी माघार घेतल्याचं खात्रीलायक सुत्रांकडून कळते. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यावर आरोप केल्याने त्या अधिकाऱ्याने चौकशी केल्यास बाजू कमकूवत होण्याची शक्यता असल्याने अखेर महाधिवक्ता कुंभकोणी आणि विधी व न्याय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार या चौकशीतून पांडे यांनी माघार घेतल्याचं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी परमबीर सिंह यांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारने संजय पांडे यांच्याकडे सोपवली होती. परंतु, परमबीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच हायकोर्टात नवी याचिका दाखल करत सरकारवर नवे आरोप केले होते. यामध्ये संजय पांडे यांनी ज्या तक्रारी मी केल्या आहेत त्या मागे घेण्याचा सल्ला दिला होता, असा आरोप परमबीर सिंह यांनी याचिकेत केला आहे. त्यांनी संजय पांडे यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचं रेकॉर्डिंग देखील हायकोर्टात सादर केलं आहे. यामुळे संजय पांडे यांनी चौकशीतून माघार घेतली.
संजय पांडे यांच्याकडे चौकशी राहिली असती तर परमबीर सिंह यांना खूप कठीण गेलं असतं. अत्यंत कडक शिस्तिचा, प्रामाणिक अधिकारी असल्याने परमबीर सिंह यांना पांडे चौकशी करु नयेत, अशी मनोमनी इच्छा होती. म्हणूच परमबीर सिंह यांनी मध्यस्थीसाठी संजय पांडे यांच्याशी संपर्क साधला, असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं.
प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यानं बोलणं उचित नाही
प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळे सध्या त्याबाबत काही बोलणं उचित नाही. सरकार त्याबद्दल योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली आहे.
परमबीर सिंह यांचा राज्य सरकारवर नवा आरोप
‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्या, नाही तर राज्य सरकार तुमच्यावर अनेक गुन्हे दाखल करेल’, असा नवा गंभीर आरोप करत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेद्वारे राज्य सरकारवर नवा आरोप करत परमबीर यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. या याचिकेवर आता ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि परमबीर सिंह यांच्यातील फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगच न्यायालयात सादर केल्याने ठाकरे सरकारवरील अडचणीत वाढ झाली आहे.
‘१९ एप्रिल रोजी महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली असता त्यांनी आपल्याला अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेण्यास सांगितले. सिंह यांनी ही तक्रार मागे घेतली नाही, तर त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू करेल’, असंही पांडे म्हणाल्याचं सिंह यांनी याचिकेत म्हटलं आहे.