पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी मला काम करायचे आहे, ज्यामुळे इतके दिवस दुर्लक्षित असलेला जिल्हा हा प्रगतिपथावर येईल. याठिकाणी अनेक मूलभूत गोष्टींसाठी काम करण्याची गरज आहे. त्याच विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज मी जव्हार दौऱ्यात बंद दाराआड चर्चा केली असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. नुकत्याच झालेल्या कोकण दौऱ्यात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर बंद दाराआड चर्चेचा संदर्भ देत आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढत बंद दाराआड चर्चेचा उल्लेख केला. या दौऱ्यात लोकप्रियतेसाठी काही घोषणा करणार नाही. पण नुसता जिल्हा होऊन उपयोग नाही, तर याठिकाणी पर्यटन, मूलभूत सेवा सुविधांमुळे स्थानिकांचे राहणीमान कसे उंचवता येईल यासाठीचा प्रयत्न असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यत्वेकरून याठिकाणची आरोग्य व्यवस्था बळकट करणे हे उदिष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पालघर जिल्ह्यातील खरवंद येथील अंगणवाडी केंद्रास भेट देऊन अंगणवाडी सेविकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
CM Uddhav Balasaheb Thackeray visited an Anganwadi Centre & interacted with the Anganwadi Sevikas at Kharwand in Palghar district. pic.twitter.com/7UZuLiJesa
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 12, 2021
पालघर हा जिल्हा म्हणून घोषित झाला तरीही याठिकाणी पाणी, रस्ते, हॉस्पिटल यासारख्या सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे पालघर विकासाला चालना मिळायला हवी असे ते म्हणाले. आरोग्य व्यवस्था सबळ व्हावी हे माझे मुख्य उदिष्ट आहे. आदिवासींना रोजगार मिळावा, उद्योग वाढावा आणि दळणवळण आणि पर्यटनवाढीच्या दृष्टीने आज विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मोखाड्यातील धरणांची सद्यस्थिती, त्याठिकाणची उंची वाढवण्याचे विषय या सगळ्या गोष्टींचे प्रस्ताव शासनासमोर आहेत. संपुर्ण जिल्ह्याचा आराखडा सध्या तयार करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक समस्यांवर काम करण्यासाठी आमचा पुढाकार राहिल असे ते म्हणाले. पालघरमधील काही तालुक्यांमध्ये कुपोषणाची समस्या आहे. या समस्यांवर तोडगा काढण्याचे आव्हान असणार आहे असेही ते म्हणाले.
विमानाच्या मुद्द्यावर राज्यपालांनाही टोला
पालघर जिल्ह्याचा विकास आराखडा आपण तयार करत आहोत. या जिल्ह्यात विकासासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामध्ये एकुणच रोजगार निर्मितीपासून ते पर्यटन विकास यासारख्या गोष्टी येत्या दिवसात पालघर जिल्ह्यात साध्य करणे शक्य होईल असे ते म्हणाले. जिल्ह्यात उद्योग आणि दळणवळणाचा विषय महत्वाचा असून त्यामुळेच येत्या दिवसात स्थानिकांची प्रगती शक्य होणार आहे. त्यामुळे येत्या दिवसात दळणवळणाच्या सुविधांमध्ये सुधारणा झाल्यानंतर काही वर्षांनी याठिकाणी विमान उतरवणेही शक्य होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यपालांच्या विमानाच्या मुद्द्यावर राजकारण गाजत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या सूचक अशा शब्दात राज्यपालांवर टोमणा लगावण्याची संधी सोडली नाही.