मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हेलिकॉप्टरचे काल, गुरुवारी मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला दुसऱ्यांदा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. यावरून राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत शिंदे यांना मित्रत्वाचा सल्ला दिला आहे.
मा. मुख्यमंत्री साहेब आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते.
काल आपण हट्टाने हॅलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणतं असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असतांना देखिल बळजबरीने त्याला…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 11, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल, गुरुवारी आपल्या साताऱ्यातील दरेगाव या मूळगावी जाण्यास निघाले होते. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे जुहू येथील पवन हंस येथे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. याबाबत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे. आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. पण मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते. काल हॅलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणत असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असताना देखील तुम्ही हट्टाने त्याला हॅलिकॉप्टरने गावी जाण्यासाठी उड्डाण घेण्यास सांगितले. तुम्ही हॅलिकॉप्टर साताऱ्याला उतरवले, नंतर आपण कुठे गेलात हे मला माहीत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Thane मनपा रुग्णालयात अनागोंदी कारभार, एकाच दिवसात 5 रुग्णांचा मृत्यू
हवामान खराब असताना कधीही हॅलिकॉप्टर उडवू नये, हे जागतिक अलिखित संकेत आहेत. तुम्ही हे का केले, ते मला माहीत नाही. पण, हे असे करणे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचे आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी एक म्हण प्रचलित आहे, असे सांगून आमदार आव्हाड यांनी म्हटले आहे की, तुम्ही अशी भूमिका घेणे किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरीत्या पटलेले नाही. कारण, कोणी काहीही म्हणो आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो, या नात्यानेच मी हे लिहित आहे. असे पुन्हा कधीही करू नका, असा मित्रत्वाचा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.