घरमहाराष्ट्रलसीकरणामध्ये मला राजकारण करायचे नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लसीकरणामध्ये मला राजकारण करायचे नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Subscribe

राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बीकेसी कोविड सेंटर येथे शुभारंभ शनिवारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कोरोना लसीकरणात राजकारण मला करायचं नाही.’ कोरोना संकटाचा सर्वाधिक जाच हा महाराष्ट्राला बसूनही लसीचा सर्वाधिक कोटा हा पश्चिम बंगालला कसा, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी केला. तेव्हा मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, मला याचे राजकारण करायचे नाही. महाराष्ट्राची जनता माझ्यासाठी महत्वाची आहे, तशी देशातील जनता ही पंतप्रधान मोदींना मोलाची वाटत असेल, असे सांगत याचे राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये पहिला कोरोना लसीचा डोस आहार तज्ज्ञ डॉक्टर मधुरा पाटील यांना दिला गेला आहे. तर दुसरा डोस डॉक्टर मनोज पाचांगे यांना देण्यात आला.
‘आपण गेले काही महिने कोरोना लसीबद्दल ऐकत होतो, लस पाहिलीच नव्हती. ती आज आपल्या समोर आलेली आहे. देशातील प्रत्येक राज्याला किती कोरोना लस दिली जाणार आहे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना योद्धांना लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ५० वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना आणि ५० वर्षांखालील आजार असणार्‍या व्यक्तींना लस दिली जाईल. जसजशी कोरोना लसीची उपलब्धता वाढेल, तशी ही लस सर्व नागरिकांना आपण खुली करून देऊ,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोणतेही राज्य सरकार कोणती लस द्यावी याचा निर्णय घेत नाही. हा निर्णय केंद्रिय आरोग्य मंत्रालय घेत असते. कोरोनासंबंधातील सूचनाही त्यांच्याकडूनच येतात. राज्य सरकार त्याचे पालन करत असते. अजून दोन ते तीन कंपन्या येत्या काळात कोरोना लस उपलब्ध करून देऊ शकतात. त्याची सध्या चाचणी सुरू असून चाचणीची खात्री झाल्यानंतर लसीकरणाचा निर्णय घेतला जाईल. ज्या लसीचा साठा केंद्राच्या पुढाकाराने राज्यात आलेला आहे, त्याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. ती कोणाला द्यावी, कशी द्यावी याबद्दल मार्गदर्शक सूचना स्पष्ट आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य कर्मचार्‍यांसाठी सध्या लस मोफत दिली जात आहे; पण ज्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल, त्यांची किमत केंद्र सरकार ठरवेल. जेव्हा केंद्र सरकार लसीच्या किमतीबाबत निर्णय जाहीर करेल तेव्हा आम्ही देखील निर्णय घेऊ. जसजसा हा कोटा उपलब्ध होईल, याचे उत्पादन वाढेल, तसतशी सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध होईल. यावरील नियंत्रण सरकारकडे असल्याने लस वाटपात काळाबाजार होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -