ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मदत व पुनर्वसन मंत्री विजय ववडेट्टीवार यांना विरोधक लक्ष्य करत आहेत. यावर आता वडेट्टीवार यांनी पलटवार करत माझ्या राजीनाम्यानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा देतो, असं विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षणाविना पोटनिवडणुका होत आहेत. याला काँग्रेस नाही, तर भाजप जबाबदार आहे, हे त्यांनी मान्य करावं. ओबीसींचं राजकीय आरक्षण जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचं त्यांना जर वाटत असेल तर ते जनतेची दिशाभूल करत आहेत. ते ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत आणि तत्कालीन सरकारने पाठवलेलं पत्र त्याचा पुरावा आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतात का याची चाचपणी करायला आम्ही घेतली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यादेश काढून निवडणुका पुढे ढकलता येऊ शकतात, असं म्हटलं होत त्याचा देखील विचार करु. जर यातून मार्ग निघत नसेल तर सर्व पक्षांनी जेवढ्या जागा ओबीसींच्या आहेत तिथे ओबीसी उमेदवार उभा करावेत आणि तसं सर्व पक्षांनी मान्य देखील केलं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
भाजपला हरवण्यावर एकमत
महाविकास आघाडीत अजिबात मतभेद नाही. भाजपला हरवायचं यावर आघाडीचं एकमत आहे. ज्या ज्या महानगरपालिकेबाबत काय निर्णय घ्यायचा ते सर्वानुमते घेऊ. अ ब आणि क महापालिकेत किती वॉर्ड असावेत ययासंदर्भात देखील चर्चा सुरू आहे. काहीच अंतिम निर्णय झालेला नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.