नाशिक : राज ठाकरे यांना माझी विनंती आहे की, तुम्ही जर शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचंदेखील नाव घ्या. प्रबोधनकार ठाकरे यांनीदेखील बरचसं काम शाहू, फुले, आंबेडकर यांच्यावर केलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं नाव घ्या बिघडतं कुठं?, असा सवाल भुजबळांनी राज ठाकरेंना विचारला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी (दि.६) रत्नागिरीत सभा झाली. यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवारांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांंचे नाव घेतले नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्याला आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उत्तर दिले आहे.
राज ठाकरे यांनी फेब्रुवारी 2018 ला पुण्यातील बीएससीसी कॉलेजला मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा दाखला छगन भुजबळांंनी दिला. मी 1991 पासून शरद पवारांसोबत आहे. अनेक वेळा पवारसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. राज ठाकरेंनी शरद पवारांची प्रगट मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीतही राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी शरद पवार म्हणाले होते की, शिवाजी महाराज हे सर्वांचेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती केली. सर्वांना सोबत घेतले. पण शाहू, फुले, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीत फार मोठे काम केले. म्हणून पवारसाहेब म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहेत.
दिल्लीत सर्वजण महाराष्ट्रातील नेत्यांना मराठा लीडर असे म्हणतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील नेता असा होतो. असे उत्तर शरद पवारांनी दिले होते, असे भुजबळ म्हणाले. माझी राज ठाकरे यांना विनंती आहे की, तुम्ही जर शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतले तर छत्रपती शिवाजी महाराजांचेदेखील नाव घ्या. प्रबोधनकार ठाकरे यांनीदेखील बरचसे काम शाहू, फुले, आंबेडकर यांच्यावर केले आहे. त्यामुळे सगळ्यांचे नाव घ्या बिघडते कुठे, असा सवालही भुजबळांनी राज ठाकरेंना विचारला आहे.