मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वपक्षीयांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून आता शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा, असे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सुनावले आहे.
मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव… pic.twitter.com/172MQ4cxXH
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) September 12, 2023
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाद्वारे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
हेही वाचा – राज्य शासनाकडून आरक्षणाला हरताळ; कंत्राटी पदभरतीवरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीवर हल्लाबोल
मात्र, ही पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन उपमु्ख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं,’ असे बोलताना मुख्यमंत्री शिंदे दिसत आहेत. त्याला ‘हो, येस,’ म्हणून अजित पवार यांनी दुजोरा दिला आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी, समोरील माइक सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना सावध केल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
याचा संदर्भ देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ट्वीट करत, मराठा आरक्षणासाठी सोमवारी रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे, अशी टीका केली आहे.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या लंडनमधील घरांच्या चाव्या अजय अशरांकडे असतील…; राऊतांचा शिंदेंना टोला
मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघत असल्याचे त्यांनी सरकारला सुनावले आहे.