मुंबईतील लोकांना ठाकरे गटाबाबत सहानुभूती आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुक एकत्र लढण्याबाबत ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. सुप्रीम कोर्टाकडून शिंदे-फडणवीस सरकारला हिरवा कंदील मिळाल्यानंतर राजकीय पक्षांनी आगामी मनपा निवडणुकीसाठी कंबर कसलेले आहे. अनेक राजकीय पक्षांचे नेते हे महानगरपालिकांमध्ये जाऊन तिथे आढावा बैठक घेत आहेत. तसेच महानगरपालिकेची एकंदर स्थिती जाणून घेत आहेत. त्यामुळे सर्वात महत्त्वाची अशी मुंबई महानगरपालिका ही सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे या महानगरपालिकेवरती आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याकरता सर्वच राजकीय नेते हे मोठ्या उत्साहाने कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “मला त्यांच्या बोलण्याने…”; संजय राऊतांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, जर का आता सर्व्हे केला तर त्यामध्ये शिवसेनेला (ठाकरे गटाला) जागा जास्त दाखवत आहे. मुंबईतल्या लोकांना निश्चितपणे शिवसेनेबद्दल एक सहानुभूती आहे. ज्या प्रकारे मधल्या काही काळात राजकीय घटना घडलेल्या होत्या, त्यामधून शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना पदावरून पायउतार व्हावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये तसा खूप काही ताकदीचा नाहीये. आमचे कमी आमदार या ठिकाणी निवडून येतात, नगरसेवक ही कमीच निवडून येतात. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना एकत्र सामोरे जाऊ, अशी विनंती केली असल्याचे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
तर, उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणताही होकार किंवा नकार दिलेला नसून याबाबत चर्चा करण्यात येईल आणि त्यानुसारच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी महत्त्वाची माहिती अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिवसेनेला आणि खास करून उद्धव ठाकरे यांना लोकांकडून मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर का ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली तर याचा फायदा त्यांनाही मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटासोबतच आपली आघाडी करणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे.
वंचितसोबत अनेकदा जुळवण्याचा प्रयत्न केला…
अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत देखील आपले मत व्यक्त केलेले आहे. प्रकाश आंबेडकर यांची आमच्या पक्षाबाबतची मते हे नेहमीच वेगळी राहिलेली आहेत. हे आज नाहीतर गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या आधी देखील निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्याकडून वंचित सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस, वंचित आणि राष्ट्रवादीने निवडणूक लढवावी असे मत होते. परंतु त्यात आम्हाला दुर्दैवाने यश आले नाही. शेवटी प्रकाश आंबेडकर हे वंचितचे नेते आहेत आणि त्यांनी काय करावं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, त्यांनी काय बोलावे हे देखील शेवटी त्यांचा निर्णय आहे. मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचा आमच्या पक्षाबद्दल नेहमीच वेगळे मत राहिलेला आहे. हे अनेकदा प्रकर्षाने आम्हालाही जाणवलेले आहे. तरी प्रयत्न करत राहणे हे ज्याचं त्याचं काम आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांना देखील सांगितले की, जर का तुमचे वंचित सोबत काही जमत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत जमवून घ्या आणि तशी त्यांच्यासोबत चर्चा करा आम्ही तुमच्या सोबत आहोतच, असं आमच्याकडून या आधी त्यांना सांगण्यात आलेले आहे, अशी माहिती देखील अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली आहे.