Imtiyaj Jalil News | ठाणे – औंरगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादला यापुढे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादला धाराशीव म्हणून ओळखलं जाईल. शुक्रवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. मात्र, या नामांतरामुळे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे खासदार इम्तियाज जलील प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान केलं आहे. मी औरंगाबादेत जन्मलो आणि औरंगाबादेतच मरेन, असं ते म्हणाले. ते मुंब्र्यात बोलत होते.
इम्तियाज जलील म्हणाले की, इम्तियाज जलील औरंदाबादचे खासदार होते. आणि औरंगाबादचेच खासदार राहणार. जिल्ह्याचं नाव बदलल्याने काहीजण नाचत आहेत, आनंद व्यक्त करत आहेत. पण मी औरंगाबादेत जन्माला आलो आणि औरंगाबादेतच मरणार, असं म्हणत त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला कडवा विरोध केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव आणला होता तेव्हाही इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला होता. जिल्ह्याच्या नामांतराला विरोध असण्या मागचं कारणही इम्तिजाय जलील यांनी यावेळी नमूद केलं.
Mumbra, Maharashtra| Imtiaz Jaleel was an MP of Aurangabad & will remain as MP of Aurangabad. Some are jumping & dancing saying that they’ve changed name of Aurangabad. But I was born in Aurangabad & I will die in Aurangabad only : Imtiaz Jaleel, AIMIM MP pic.twitter.com/d0voxF5IUS
— ANI (@ANI) February 26, 2023
ते म्हणाले की, कोणत्याही शहराचं नाव बदलायचं असेल तर जवळपास ५०० कोटींचा खर्च येतो. दिल्लीतील एका अधिकाऱ्याने मला सांगितलं की औरंगाबादसारख्या शहराचं नाव बदलायचं असेल तर जवळपास १००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे नामांतर फक्त सरकारी दस्तावेज, पत्र, पत्रकांपुरतं मर्यादित नाही. प्रत्येक करदात्यांचा पैसा या नामांतरासाठी खर्च होतो. त्यामुळे असं नामांतर करण्यास विरोध केला पाहिजे, असंही इम्तियाज जलील म्हणाले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं सरकार वाचावं याकरता औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव आणला होता. काही लोक प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतात, अशी टीकाही इम्तियाज जलील यांनी केली आहे.