मुंबई : कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच नांदेडच्या (Nanded) डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात (Dr. Shankarao Chavan Government Hospital) मागील 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा (सहा मुली, सहा मुले) समावेश असल्याचे म्हटले जात आहे, तर सर्पदंश आणि इतर गंभीर आजारामुळे १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी दिली. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून मृतांचे नातेवाईक प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही ट्वीट करत भाजपाच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही, असा आरोप केला आहे. (In the eyes of BJP the lives of the poor are not worth Rahul Gandhis criticism after the Nanded incident)
हेही वाचा – अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार? नांदेडच्या घटनेवरून ठाकरे गट आक्रमक
राहुल गांधी यांनीह ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रातील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. भाजपा सरकार आपल्या प्रसिद्धीवर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नांदेड़, महाराष्ट्र के सरकारी अस्पताल में दवाइयों की कमी से 12 नवजात शिशुओं समेत 24 लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत दुखद है। सभी शोकाकुल परिवारों को अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
भाजपा सरकार हज़ारों करोड़ रुपए अपने प्रचार पर खर्च कर देती है, मगर बच्चों की दवाइयों के लिए…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 2, 2023
रुग्णालयातील अधिष्ठता काय म्हणाले?
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. श्यामराव वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा (सहा मुली, सहा मुले) समावेश आहे. या सर्वांच्या मृत्यूमागे वेगवेगळी कारणे आहेत. अपुरे कर्मचारी असतानाच काही कर्मचार्यांच्या बदल्या झाल्यामुळे मनुष्यबळाची कमतरता आहे. रुग्णसेवेवर परिणाम होऊ न देता कर्मचारी झोकून देत कर्तव्य बजावत आहेत. औषधांची खरेदी होऊ न शकल्याने रुग्णांवर उपचार करण्यात अडचण निर्माण होत आहे. 70 ते 80 किमीच्या परिसरातील मोठ्या संख्येने रुग्ण शासकीय रुग्णालयातच येत असल्याने कर्मचार्यांवर कामाचा ताण आहे, असे डॉ. श्यामराव वाकोडे म्हणाले.
हेही वाचा – 24 जणांच्या मृत्यूनंतरही आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ; विरोधकांकडून सरकारवर ताशेरे
विरोधकांचे शिंदे सरकारवर टीकास्त्र
नांदेडच्या घटनेनंतर विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधताना ट्रिपल इंजिन सरकारने या घटनेची जबाबदारी घ्यावी, असे म्हटले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, एकूण 24 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 70 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. याठाकिणी वैद्यकीय सुविधा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अनेक परिचारिकांच्या बदल्या झाल्या आहेत. अनेक मशीन काम करत नाहीत. रूग्णालयाची क्षमता 500 रूग्णांची असली तरी येथे 1200 रूग्ण दाखल आहेत. याबाबत अजित पवार यांच्याशी बोलणार असल्याचे काँग्रेस नेत्याने सांगितले. सरकारने याकडे गांभीर्याने बघून परिस्थिती नियंत्रणात आणली पाहिजे.