राज्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. या लॉकडाऊनचा फटका अनेक उद्योग धंद्यांना बसला आहे तसाच काही यंदा ज्यांची लग्न ठरली आहेत त्यांना देखील बसला आहे. मे महिन्यात ठरलेली बरीचशी लग्ने सध्या लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली आहेत. मात्र सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली या गावातील एका नवविवाहित दांपत्याने लग्नसराईचा हंगाम संपत चालल्यामुळे सरकारच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता अनोख्या पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पडला. आता तुम्ही म्हणाल हे कसे काय शक्य?
असा झाला विवाह सोहळा
इन्सुली गावकरवाडी येथे राहणारा वर स्वप्नील दीपक नाईक आणि सातार्डा येथे राहणारी वधू रसिका मनोहर पेडणेकर यांचा महिन्याभरापूर्वी लग्न सोहळा ठरला होता. या विवाहाला दोघांच्याही घरच्यांकडून संमती होती. दरम्यान एप्रिल महिन्यात हा लग्न सोहळा पार पडणार होता. मात्र एप्रिलमहिन्याच्या अखेरीस सरकारने लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे आता लग्न करायचे कधी हा प्रश्न या दांपत्याना पडला होता. मात्र त्यांनी लग्न साध्या पद्धतीने करावे अशी नामी शक्कल त्यांनी लावली आणि विवाहासाठी त्यांनी तहसीलदारांकडे परवानगी मागितली. यावेळी तहसीलदारांनी फक्त पाच माणसांच्या उपस्थित हा विवाह करण्यास हरकत नाही,असे स्पष्ट केले. मात्र, या विवाहादरम्यान शासनाने लॉकडाऊन काळात जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही यावेळी सांगितले. त्यानंतर वधू-वरांनी तहसीलदारांनी घातलेली अट मान्य करून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्ससिंचे पालन करून हा सोहळा पार पडला.
लग्न सोहळ्याला चार जणांची उपस्थिती
दरम्यान सरकारी नियमांचे उल्लंघन होऊ न देता या दांपत्याने लग्न केले. त्यांच्या या लग्न सोहळ्याला वधू-वरांच्या घरातील कोणीच उपस्थित नव्हते. फक्त नवरदेवाचा एक मित्र आणि भटजी मिळून अवघ्या चार जणांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला. दरम्यान लग्न झाल्यानंतर या विवाहितांची वरात दुचाकीवरुनच दारात आली. यावेळी, नवरदेवाचा मित्र हेमंत वागळे याने देखील या सोहळ्याला विशेष सहकार्य केले. बांदा येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात हा विवाह संपन्न झाला.यावेळी वधूवरांच्या दोन्ही कुटुंबीयांकडून तहसीलदार म्हात्रे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.