राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने सुनावताच सर्वच राजकीय पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका देखील याच वर्षी लागण्याचे संकेत भाजपकडून देण्यात आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू करण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. ही बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाचे मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा – अजित पवार यांच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्रातल्या ‘या’ खेळाडूंना मिळाला न्याय
या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर जिल्हानिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या बाबतही काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. मागच्या काही वर्षांपासून पक्ष संघटनेत असे अनेक पदाधिकारी आहेत, जे अनेक वर्षांपासून त्याच पदावर कायम आहेत. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांच्या जागी नवे पदाधिकारी नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबईमध्ये तर असे अनेक पदाधिकारी आहेत, जे तब्बल 9 वर्षांपासून एकाच पदावर आहेत. त्यामुळे लवकरच जुन्या तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
येत्या 10 जूनला राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापनदिन पार पडणार आहे. हा वर्धापनदिन नगरमध्ये साजरा करण्यात येणार आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादीकडून भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली. तर यापुढे ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमावर अधिक भर देण्यात येईल तसेच बूथ कमिट्या अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय स्तरावर काही नेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून या कमिट्या मजबूत करण्यात येतील. तसेच पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रीयाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदरणीय पवार साहेबांनी पक्षाच्या… pic.twitter.com/mx1PNrWQpR
— NCP (@NCPspeaks) May 17, 2023
तसेच, या बैठकीत जिल्ह्यांची जबाबदारी ही राष्ट्रवादीच्या काही महत्त्वाच्या नेत्यांवर देण्यात आलेली आहे. यामध्ये कोकणाची जबाबदारी सुनील तटकरेंवर, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकनाथ खडसेंवर, ठाणे-पालघरची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांवर आणि अनिल देशमुखांकडे नागपुरची जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.