मुंबई -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिलेली दिवाळी भेट तुटपुंजी असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. हा ठिगळं लावण्याचा प्रकार असल्याचं बरगेंनी म्हटलं आहे.
महामंडलाने ७३८.५० कोटी रुपायंची मागणी शासनाकडे केली होती. सुरुवातीला त्यापैकी ३०० कोटी रुपये महामंडळाला दिली होती. तर आता त्यात ४५ कोटींची वाढ करून देण्यात आली आहे. या निधीमध्ये कर्मचारी समाधानी नाहीत. गेली सात वर्षे कर्मचाऱ्यांना अडीच हजार व अधिकाऱ्यांना पाच हजार मिळत होते. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या रकमेत अडीच हजारांची भर घालून कर्मचारी व अधिकारी हा भेदभाव कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बरगेंनी म्हटलं आहे. हे जरी असले तरी सात वर्षापूर्वीची महागाई व आताची महागाई यात जमीन अस्मानाचा फरक आहे. रेल्वे, महापालिका व बेस्टच्या तुलनेत ही भेट रक्कम खूपच कमी असल्याचे बरगेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. महागाई भत्ता आता २८ वरून ३४ टक्के झाल्याने त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यात आणखी ४ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढला आहे. हे सर्व मिळून महागाई भत्ता द्यावा अशी मागणी करण्यात येतेय.