भारतीय संघाच्या मुंबई कसोटी सामन्याआधी क्रीडाप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मुंबईकर असलेला अजिंक्य रहाणेसोबतच आणखी दोन महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय हा बीसीसीआयने घेतला आहे. भारतीय संघातील तीन खेळाडू हे दुखापतग्रस्त झाल्याने मुंबई कसोटीतून विश्रांती घेत असल्याची माहिती बीसीसीआय (BCCI)कडून आज सकाळी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा या तीन खेळाडूंचा समावेश आहे. तिन्ही खेळाडू हे कानपूर कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाले होते. पण मुंबई कसोटी सामन्यासाठी त्यांच्या फिटनेस टेस्टमध्ये यशस्वी न ठरल्यानेच त्यांनी विश्रांती देण्यात आली आहे. मुंबईतील कसोटी सामन्यामध्ये मुंबईकर असलेल्या अजिंक्य रहाणेचा संघाला फायदा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण अजिंक्य रहाणे दुखापतग्रस्त झाल्याने त्याला विश्रांती देत असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.
जलदगती गोलंदाज असलेल्या इशांत शर्माला डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे. कानपूर कसोटीमध्ये शेवटच्या दिवशी इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळेच दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार नाही. बीसीसीआय या खेळाडूचा दुखापतीकडे लक्ष ठेवून आहे, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले. तर ऑलराऊंडर रवींद्र जडेजाही उजव्या हाताच्या दुखण्याने हैराण आहे. पहिल्या कसोटीमध्ये त्याच्या हाताला दुखापत झाली होती. स्कॅनिंमध्ये त्याच्या हाताला सुज असल्याचे समोर आले. त्यानंतर उजव्या हातावर उपचार करण्यात आले. त्यामध्ये सुज कमी झाली नसल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळेच जडेजाला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
अजिंक्य रहाणेचे डाव्या पायाच्या स्नायूंचे दुखणे बळावल्यानेच कानपूर कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी त्याला त्रास झाला होता. त्यानंतर विश्रांती घेतल्यावरही पुर्णपणे रिकव्हर न झाल्यानेच रहाणेला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.
तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने श्रेयस अय्यर आणि मयांक अग्रवाल यांना संघात कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच विराट कोहली कमबॅक करत असल्याने आता दोघांबाबत काय निर्णय होणार हे लवकरच स्पष्ट होईल. इशांतच्या जागी कोणत्या गोलंदाजाला संधी मिळते हेदेखील थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
दरम्यान ११.३० वाजता पुन्हा खेळपट्टीचे परीक्षण केले जाणार आहे. त्यानंतर १२ वाजता सामन्याला सुरूवात होईल असे BCCI ने ट्विट केले आहे. दिवसभरात ७८ ओव्हरचा खेळ पहिल्या दिवशी होईल. पहिले सत्र हे १२ ते २.४० दरम्यान होईल. त्यानंतर चहापानासाठी २.४० ते ३ इतक्या वेळात ब्रेक दिला जाईल. चहापानानंतर ३ वाजता पुन्हा खेळाला सुरूवात होईल. आज ५.३० वाजेपर्यंत सामना खेळवला जाईल अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
Ind vs Nz : मुंबईकर महिलांकडे स्कोअररची जबाबदारी, ११ वर्षांची प्रतिक्षा संपली