कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असून ३ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर भारतीय रेल्वेने ३ मे पर्यंत सगळ्या प्रवासी रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने आतापर्यंत रेल्वे तिकीट बुकिंग झालेल्या ३९ लाख ट्रेन तिकीटांना रेल्वेकडून रद्द करण्यात येणार आहे.
भारतीय रेल्वेकडून ३९ लाख रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे की, प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत देण्यात येणार आहे की नाही. मात्र याचे उत्तर IRCTC कडून प्रवाशांना देण्यात आले आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रेनला ३ मे पर्यंत रद्द केल्यानंतर प्रवाशांना त्यांचे ई-तिकीट रद्द करण्याची आवश्यकता नाही. प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचे पुर्ण पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे मंगळवारी IRCTC कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Railways set to cancel around 39 lakh tickets booked for April 15-May 3 due to extension of nationwide lockdown: Sources
— Press Trust of India (@PTI_News) April 14, 2020
दरम्यान, IRCTC कडून असे सांगण्यात आले होते की, १५ एप्रिलनंतर ज्या प्रवाशांनी तिकीट बुक केले आहेत, त्या सर्व प्रवाशांना त्यांच्या तिकीटाचे पुर्ण पैसे परत देण्यात येणार आहे. यापुर्वी २२ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान बुक केलेले तिकीट रद्द करण्यात आले होते. तसेच प्रवाशांना तिकीट रद्द करण्याची आवश्यकता नाही ते रेल्वेकडूनच रद्द करण्यात येतील. मात्र प्रवाशांनी ते स्वतः रद्द केले तर त्याचे नुकसान प्रवाशांनी होईल, असे देखील सांगण्यात आले होते.