मुंबई : मुंबईत अद्याप कुठल्याही रस्त्यांची कामे सुरू झालेली नसताना कंत्राटदाराना आगाऊ रक्कम देणे, हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय ठरेल. जोपर्यंत रस्त्यांची कामे सुरू होत नाहीत तोपर्यंत कोणालाही आगाऊ रक्कम देता कामा नये. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) भ्रष्ट कारभारात आपण हस्तक्षेप करावा आणि कंत्राटदारांना देण्यात येणारी 600 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम त्वरित रोखावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बुधवारी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्याकडे केली.
मुंबई महानगरपालिकेतील लूट आणि रस्ते घोटाळा थांबवण्यासाठी माझे माननीय राज्यपाल महोदयांना पत्र.
My letter to the Hon’ble Governor of Maharashtra, seeking his intervention to stop the loot at BMC through the road mega scam. pic.twitter.com/Gd6gnOWNpO
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 17, 2023
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबत आदित्य ठाकरे यांनी आरोप करत राज्यपालांकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल बैस यांची राजभवन भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. राज्यपालांना दिलेल्या निवेदनानंतर मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी केले असले तरी त्यात संदर्भहीन स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार गैरव्यवहार सुरू असून भ्रष्टाचार थांबलेला नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे रस्त्यांसंदर्भात जारी केलेले टेंडर रद्द करावे आणि निवडून आलेली प्रतिनिधींची समिती किंवा निवृत्त न्यायधीशांच्या समितीच्या मदतीने पारदर्शकपणे पुन्हा नव्याने टेंडर जारी करावे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
लोकशाही पद्धतीने नगरसेवक निवडून येण्याआधीच मुंबई महापालिकेचा जास्तीत जास्त पैसा खर्च करता यावा, यासाठी पालिका आणि प्रशासनावर उच्चपदस्थांकडून दबाव आणला जात आहे. या पैशांचा होणारा अपव्यव थांबवून याची चौकशी करण्यासाठी आम्ही दिलेली याचिका आपल्यामार्फत लोकायुक्तांकडे पाठविण्यात यावी, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी पत्रात केली आहे.
हेही वाचा – सीबीआय, ईडी आली नाही? काँग्रेस नेत्याच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाची मिश्किल टिप्पणी