घरमहाराष्ट्रमहाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होतंय? संजय राऊतांचा उद्विग्न सवाल

महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होतंय? संजय राऊतांचा उद्विग्न सवाल

Subscribe

मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून विरोधकांनी घमासान केले. मात्र, तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. तसंच, मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य करताच त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं. मग हीच तत्परता राज्यपालांच्या बाबतीत का दाखवली नाही असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिलेल्या रोखठोकमधून विचारला आहे. तसंच, ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देऊन जनमताचा उठाव घडविण्याची संधीही विरोधकांनी या प्रश्नी गमावली. शिवरायांचे चरित्र विसरले जात आहे. महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे कारस्थान यशस्वी होत आहे काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा राजकीय स्वार्थासाठी भाजपा सावरकरवादी; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ हल्लाबोल

- Advertisement -

‘सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे. तसे नसते तर महाराष्ट्राच्या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यास भाजपचे नेते व त्यांचे राज्यपाल धजावले नसते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांना ‘कालबाह्य’ म्हणजे जुने-पुराणे हिरो असे संबोधून वादळ ओढवून घेतले आहे. इकडे राज्यपाल शिवराय जुनेपुराणे झाले असे म्हणतात तर तिकडे भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी राजांनी औरंगजेबास तडजोडीसाठी पाच पत्रे पाठवली म्हणजे माफीच मागितल्याचा स्फोट करून महाराष्ट्राची मने दुखावली आहेत. या दोन लोकांनी शिवाजी राजांचा अपमान करूनही महाराष्ट्राचे सरकार तोंड शिवून बसले. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अपमानाच्या विरोधात साधा निषेध केला नाही. उलट राज्यपाल कोश्यारी व त्रिवेदी यांचा बचाव केला. असे आक्रित इंग्रजकाळातही घडले नव्हते. म्हणूनच काळ मोठा कठीण आला आहे असेच म्हणावे लागेल,’ असं संजय राऊत म्हणाले.

‘शिवरायांचा अपमान राज्यपालांनी पहिल्यांदाच केला नाही, याआधी तो वारंवार केला आहे. राज्यपाल कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, ही मागणी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. अशा राज्यपालांचे व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणे हा राजद्रोहासारखा गुन्हा आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांची केलेली निंदा हा जर राजद्रोहासारखा गुन्हा ठरत असेल तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवरायांची निंदा हा राजद्रोहच म्हणायला हवा. दोन मुद्दे भाजपच्या नेत्यांनी मांडले, ते म्हणजे शिवाजी महाराज हे जुने झाले व छत्रपती हे नव्या युगाचे ‘नायक’ नाहीत. जे राज्य चारशे वर्षांनंतरही शिवाजी राजांच्या विचाराने चालले ते कालबाह्य ठरवून भाजप व त्यांच्या लोकांना काय सांगायचे आहे?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाचे राज्य आल्यापासून धर्माचे राज्य व देशावर देवाची कृपा झाल्याचा प्रचार; सामनाच्या ‘रोखठोक’मधून निशाणा

‘शिवाजी महाराज ‘नायक’ नसते तर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचा घाट घातलाच नसता. टिळकांनी गणपती व शिवराय घरातून मांडवात आणले. शिवाजी-भवानीच्या नावानेच संयुक्त महाराष्ट्राचा लढादेखील पेटवला व जिंकला गेला. मुंबई महाराष्ट्रास मिळाली. शिवसेनेसारखे ज्वलंत, राष्ट्रीय बाण्याचे संघटन तर शिवाजी राजांच्या प्रेरणेतूनच उभे राहिले. शिवराय कालबाह्य झाले असते तर त्यांचे नाव कशाला कोणी घेतले असते?’ असं संजय राऊतांनी विचारले आहे.

‘महाराष्ट्रात शिवराय हे श्रद्धास्थान आहे व जगासाठी ते आदर्श वीरपुरुष आहेत. शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य फक्त लोककल्याणासाठी होते. त्याच लोककल्याणाचा विचार सर्वच राज्यकर्त्यांनी पुढे नेला. शिवाजी राजांविषयी चुकीची विधाने पंडित नेहरू ते मोरारजी देसाईंनी केली. तेव्हा खवळलेल्या महाराष्ट्राने त्यांना माफी मागायला भाग पडले. तोच महाराष्ट्र आज थंड, लोळागोळा होऊन पडला आहे. मागे एका प्रकरणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान झाला म्हणून संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना ‘सांगली बंद’ केले, पण आज छत्रपती शिवरायांचा भाजपकृत अपमान होऊनही ते गप्प आहेत. या प्रश्नी सर्व शिवप्रेमी संस्था व संघटनांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र बंद’चीच हाक द्यायला हवी. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यावर इस्लामी व अरब राष्ट्रांनी निषेध करताच भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, पण छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचे मात्र समर्थन केले जाते! बदनामी करणाऱ्यांचा केसही वाकडा झाला नाही. ते त्यांच्या पक्षात आणि पदावर कायम आहेत! महाराष्ट्राला नामर्द बनवण्याचे कारस्थान विषप्रयोगाप्रमाणे तडीस जात आहे! उसळून उठण्याची महाराष्ट्राची क्षमता नष्ट होत आहे!,’ असा रोखठोक संजय राऊतांनी केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -