शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहेत असा आरोप केला आहे. यावर ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडायचे नाहीत हे ठरलं आहे, असा खुलासा हसन मुश्रीफ यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. प्रताप सरनाईक यांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं, असं देखील सरनाईक म्हणाले.
प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र ही सुद्धा भाजपची चाल आहे, असा दावा देखील हसन मुश्रीफ यांनी केला. तसंच भाजपकडून सुडाचं राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे वाघ अशा धमक्यांना घाबरणारे नाहीत. भाजपकडून ज्या धमक्या दिल्या जात आहेत, त्याला सेना घाबरणार नाही, असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.