विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सरकार विरोधकांना विश्वासात घेत नाही आहे. विश्वासात न घेता कामकाज सुरु आहे. या सरकारला चर्चा करण्यात रस नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शक्ती कायद्यावर भाष्य करताना चर्चेविना शक्ती कायदा मंजूर करणे योग्य होणार नाही, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. तसेच कारशेडवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कांजूरमार्गच्या कारशेड वरुन सरकारची काहीशी अडचण झाली आहे. आरेमध्ये कारशेड व्हावे, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“शक्ती कायद्याच्या संदर्भात व्यापक चर्चा झाली पाहिजे असे आमचे मत आहे. सरकारने एक दिवसाच्या अधिवेशनात हा कायदा मांडला आहे. फार महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यावर विस्तृत चर्चा न होता मंजूर झाला तर कदाचित त्या कायद्याचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे आम्ही मागणी केला आहे की तो कायदा संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावा. पण सरकारला जर समितीकडे पाठवायचा नसेल तर तो पुढच्या अधिवेशनात घ्यावा. पण त्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे. चर्चेविना हा कायदा मंजूर करणे योग्य होणार नाही,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
“कांजूरची जमीन वादात आहे. केंद्र सरकार आणि खाजगी व्यावसायिक अशा दोघांनी त्या जागेवर हक्क सांगितला आहे. सरकारने नेमलेल्या समितीनेच कांजूरला कारशेड हलवण्याचे आर्थिक आणि इतर तोटे नमूद केले आहेत. तरीही स्वत:चे म्हणणे रेटून नेल्यामुळे सरकारची न्यायालयात बिकट अवस्था झाली. मुंबईकरांना मेट्रोपासून दूर ठेवण्याचा डाव सरकारने थांबवला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.