आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाळवा तालुक्यातील साखराळे गावात उपस्थित राहून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी… आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी… प्रभावी… प्रगल्भ… तरुण पुरोगामी विचारांसाठी’ … राष्ट्रवादी पक्षाच्या या उपक्रमाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशाचे नेते आदरणीय शरद पवारसाहेबांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. आपल्या पक्षाच्या मागे विचारांची एक मोठी ताकद आहे. या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
वैचारिक देवाणघेवाण करावी…
महिन्याच्या पहिल्या शनिवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घ्यावी… वैचारिक देवाणघेवाण करावी… आपल्या गावाचा… तालुक्याचा… शहराचा… जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी विचारमंथन करावे. आपला पक्ष हा शिस्तप्रिय आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त रुजली पाहिजे यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अध्यक्ष आदरणीय शरद पवारसाहेबांच्या वाढदिवशी जयंत पाटील यांनी केले होते त्याची सुरुवात आजपासून केली.
विचारधारेने प्रत्येक कार्यकर्ता प्रेरीत झाला पाहिजे
महाराष्ट्रात एकही असा तालुका नाही जिथे पवारसाहेबांच्या विचारांना मानणारा वर्ग नाही. माणसाने आयुष्यात काय कमावले पाहिजे तर ती माणसं… हे पवारसाहेबांनी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या माणसांच्या धनामुळे सिद्ध केले आहे. पवारसाहेबांच्या विचारांची वैचारिक शिदोरी आपल्याकडे आहे ती शिदोरी महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारधारेने प्रत्येक कार्यकर्ता प्रेरीत झाला पाहिजे. हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी… आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी…हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
सध्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक माध्यमातून सातत्याने होणाऱ्या जातियवादी विचारांच्या प्रसाराऐवजी एक प्रगल्भ नवी पिढी जर आपल्याला घडवायची असेल तर एक – दोन तास पक्षासाठी देणे आवश्यक आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा : PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात दहावा हप्ता जमा करण्याबाबत पीएम मोदींकडून मोठी घोषणा